Pages

शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

रोकडेश्वर विद्यालयाचे आई- बाप ( कापूसकर सर व मिंडे सर )

नमस्कार 

गेली दोन तीन दिवस बरेच लेख वाचले...आवर्जून एक ना एक ओळ वाचून काढली.
आज तसा नं. आहे कापूसकर सरांचा.... उशिरा का होईना काहीतरी लिहावेसे वाटले...इतक्या जणांचे लेख वाचून माझ्यातला लेखक देखील जागा झाल्यासारख मला वाटतंय....!


आता कापूसकर सरांविषयी दोन शब्द लिहिताना मी थोडा जरा मिंडे सरांचा आधार घेऊन बोलतो...!

धाक ...... दहशत .....दरारा = मिंडे सर.

माया.... आपुलकी......दया = कापूसकर सर.



कापूसकर र व मिंडे सर 


माझ्या नजरेतून सांगायचे झाले तर मिंडे सर म्हणजे  रोकडेश्वर विद्यालयाचे बाप  तर कापूसकर सर म्हणजे आई अशा मी त्यांना उपमा देईल.

मुलावर जेव्हा योग्य संस्कार होतात तेव्हा त्याला तितकीच आईच्या मायेची आणि बापाच्या कठोरतेची गरज असते. आणि असे असेल तरच मुलांवर व्यवथित संस्कार होतात. आणि इथे बरोबर हेच झाले असावे असे मला वाटते.

कितीहि लहान मुल असेल ते जेव्हा विनाकारण रडत असत तेव्हा बापाची एक नजर मुलाला शांत करते तशी आपल्या भेदक नजरेने संपूर्ण शाळा शांत करण्याची ताकत मिंडे सरांमध्ये होती.
आणि त्या उलट विनाकरण जशी मुल आईशी हट्ट धरून लाडीगोडी लावतात तशी सर्व विद्यार्थी कापूसकर सरांना मार वाचवन्यासाठी लावायचे. आणि ते आई प्रमाणे प्रेम दाखवून त्याला सोडून पन द्यायचे.


आईकडून मुलांना जसे कौटुंबिक संस्कार मिळतात तसे कापूसकर सरांनी मनमोकळे पणाने वागायला शिकवले.
आणि त्याच प्रमाणे जसे सामाजिक संस्कार वडिलांकडून मिळतात तसे मिंडे सरांनी समाजात कसे वागायचे याचे पुरेपूर धडे दिले.
मोडेल पण वाकणार नाही ....
स्वाभिमान....
स्वावलंबी वृत्ती ....
हे त्यातीलच काही.....!


शिकवणीच्या बाबतीत कापूसकर सरांचे वागणेहि एका आईप्रमाणे,
अगदी short फॉर्म सारखे लिखाण असले तरी त्यांना चालायचे ...शिकवणी देखील त्याच पद्धतीची
अ नि ता = आम्ल मध्ये  निळा लिटमस तांबडा होतो
बे ता नी = अम्लारी मध्ये तांबडा लिटमस निळा होतो असे.

किंवा अगदी झिरो गणातील मुल्द्रव्यांसारखे निवांत.


तर दुसरीकडे मिंडे सर म्हणजे बापासारखा कटाक्ष... गाईड वगेरे तर त्यांच्या डोक्याला लागतच नव्हते.  मग काय तर गुप्तधन - प्रेमचंद , जादुगर - चक्रवर्ती राजगोपालाचार्य ( ये देखिय यह कलियुग का अमृत है बडी अजीब दवा है ,इसका नाम जीवनरस है.......) , 
 ते  साए -  डॉ. हिमांशू जोशी  ( तिनको के सहारे तो  हर कोई जि लेता है मगर कभी कभी तिनको के साए मात्र आसरे भवर से निकलकर किनारे पर आ लगते है.... )  ,
पर्यंत मुलांचे सर्व धडे ना धडे आजही पाठ आहेत.  असा तो कटाक्ष होता.

जशी बापापुढे कुठलीही छोटी चूक मान्य नसते तशी साधा काना उकार वेलांटीहि पहिली वा दुसरी चुकली तरी ती त्यांना मान्य नसायची इतकी बारीक नजर.


एक हिटलर तर दुसरे गांधी ....एक तळपता सूर्य तर दुसरे पूर्णिमेचा चंद्र....एक भडकती ज्लाला तर दुसरे हिमालायचा बर्फ.
आणि ते विध्यार्थ्याना गरजेचे देखील होते कारण कोणी आग होत असेल तर कोणी पाणीही झाले पाहिजे.

असो

परंतु आजही कापूसकर सर दिसताच आपुलकीचे निघणारे दोन शब्द...!  आणि मिंडे सर दिसताच आदराने नकळत त्यांच्या पायाकडे जाणारे हात म्हणजे  त्यांच्याप्रती आजही असलेले प्रेम आणि त्यांनी दिलेल्या संस्कारच प्रतिक म्हनाव लागेल.  

खर तर दोघांच्या विषयात अपेक्षेपेक्षाही खूप सारे मार्क मला मिळाले परंतु त्याही पेक्षा जीवनात उपयोगी येतील असे खूप सारे ज्ञान तुमच्याकडून मिळाले आणि त्यातच खूप समाधान वाटतय.

लिहियाला गेल तर एक कथासंग्रह होईल इतके लिहिण्याजोगे आहे परंतु आता थांबतो.

तुम्ही नेहमी प्रेरणादायी होतात आणि असणार यात काही शंका नाही.
प्रणाम सर....!

Thank you sir…!







शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

स्वप्रयात्नातून डिजिटल क्रांती

स्वप्रयात्नातून डिजिटल क्रांती आणि डिजिटल गाव....!

सह्याद्रीच्या कुशीत, डोंगरदर्यांमध्ये वसलेले, संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी परिसर म्हणजे निसर्गाने दोन्ही हातांनी उधळलेल्या अनुपम सौन्दर्यांचे जणू एक शिल्पच म्हणावे लागेल.
या सुंदर शिल्पाच्या मुकुटात खोचलेला शिरपेच म्हणजे आपल्या गावासाठी गावातील सर्वच स्तरातील नागरिकांनी केलेलं अनोख कार्य.

मूळताच परिस्थितीजन्य संकटांनी वेढलेले हे गाव. संकटेही अशी कि सर्वसाधारण विचार केला तर त्यावर मात करणेही तितकेच अवघड आणि अशक्य. परंतु म्हणतात ना प्रयत्न आणि इच्छाशक्ती असली कि कुठलिही कामे आणि आव्हाने खुजी वाटतात.
अगदी तसच काहीतरी या गावाने आणि तेथील नागरिकांनी करून दाखवले आहे.
गावच्या नागरिकांचा संपूर्ण सहभागाणे एक यशस्वी पाणलोट प्रकल्प राबवण्यात आला आणि या प्रकल्पामुळे कधीकाळी पाण्यासाठी वणवण करणारे गाव आज सुजलाम सुफलाम झाले आहे. प्रकल्पहि असा पूर्ण केला कि गाव तर स्वयंपूर्ण झाले परंतु पाणलोटाचे असे मॉडेल उभ्रारले कि याचा अभ्यास संपूर्ण देशाने केला आणि अजूनही करत आहे. (आमीर खानच्या पाणी फौंडेशन उभारणीतहि खारीचा वाटा – एक उदाहरण)
यालाच जोड मिळाली गावच्या महिलांची....ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण व्हावी या हेतूने महिला बचत गट स्थापन झाले. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला संपूर्ण पणे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण झाल्या. 

संपूर्ण जगाने आदर्श घ्यावा असं संघटन आणि या संघटनातून साधलेला परीसरीचा उत्कर्ष , विकास हे सामान्य घरातून आलेल्या महिलांनी, त्यांच्या एकोप्यातून , संघटनेतून विविध आदर्श निर्माण केले याची दखल घेत देशपातळीवरच नव्हे तर विदेशातूनहि याचे कौतुक केले जात आहे.
पाणलोटच्या माध्यमातून पाण्याने सुजलाम झालेले असो किंवा मळादेवी महिला विकास समितीच्या अंतर्गत महिला बचत गटाच्या माध्यमातून खरी आपल्या पायावर उभी राहिलेली म्हसवंडीची महिला असेल यापुढे जाऊन मागील पिढीने घेतलेला वसा पुढे चालवण्यासाठी  नौकरीनिमित्ताने गावाबाहेर मुंबई, पुणे सारख्या शहरात गेलेल्या तरुणांनी विसंवादातून सुसंवादाकडे गेलं की सुधारणांची किमया कशी साध्य होऊ शकते हे या तरुणांनी दाखवून दिलं आणि एका व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या मातृभूमीचा विकासासाठी एकत्र येऊन आकाराला आले एकता फौंडेशन नावाचे विचार मंच... सामाजिक उपक्रमाची एक छोटी संस्था.
या माध्यमातून तरुणांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे आणि वयक्तिक शक्य तेव्हढे कार्य करण्याचा प्रयत्नही प्रत्येक तरुण करत आहे. गावातील खर्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचे काम प्रत्येकजण आज करताना दिसत आहे. 




       आतापर्यंत ज्या गोष्टींचा अभाव आहे ते स्वप्रयत्नातूनच करण्याचा एक वेगळा ध्यास तरुणांनी घेतला आहे. गावातील दोन्ही शाळांमध्ये संगणक  सोय करून दिली असल्याने गावातील विद्यार्थी पहिलीपासून संगणक शिकत आहेत. अशा अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न हा गावातीलच तरुणांनी, नागरिकांनी केला आहे.
एक खेडे गाव जिथ परिस्थितीजण्य कारणामुळे साध्या मोबाईल नेटवर्कचाही अभाव, तसे पाहायला गेले तर लोकसंख्याही जेमतेम, नेटवर्क towar साठी अनेक प्रयत्न झाले आणि चालूही आहेत. सरकारी BSNL  ने पुढच्या तारखा देऊन देऊन, कारणे देऊन देउन हातच झटकले. Idea, Airtel कंपनीला वारंवार विनंती केल्यानंतर दोन सर्वे देखिल झाले परंतु टेक्निकल प्रोब्लेम आहे आणि त्यावर काम करावे लागेल तेव्हाच काहीतरी करता येईल अशी गेल्या दोन वर्षापासून चाललेली त्यांची प्रोसेस आहे.

अश्या सर्व गोष्टी असल्या तरी आज गावातील प्रत्येक घरातच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीकडे फिचर फोन आहेत कारण प्रत्येकाने त्यावर उपाय म्हणून प्रत्येकाच्या घरी आपले रेंज स्पॉट शोधून ठेवले आहेत. जग आधुनिकतेकडे जात असताना आम्हीही त्यासोबत जात आहोत त्यात अडचणी असल्या तरी त्यावर मात करून, हेच यातून सांगण्याचा प्रयत्न.
आज गावात त्यात निम्म्याहून जास्त लोकांकडे स्मार्टफोन आहेत. गावात डीजीधन योजनेअंतर्गत एक ऑनलाईन मिनी Nationalised  बँकिंग सिस्टीम आहे. गावातील रेशन धान्य आज पेपरलेस झाले आहे फक्त हाताच्या अंगठ्यावर डिजिटल मशिनद्वारे आज रेशन असेल, बँकिंग सुविधा असेल असे विविध कामे केली जातात.
आता इतक्या सुविधासांठी आणि ग्रामपंचायतचे कामकाज यांच्यासाठी खरी गरज होती ती एका सक्षम इंटरनेटची. तात्पुरते उपाय आणि पर्यायांवरच आतापर्यंत ह्या गोष्टी चालूं आहे. सरकारी मदतची वाट पाहत बसायचे झाले तर पुढील वीस वर्षात पण काही होऊ शकणार नाही हे सर्वांना माहित होत.

म्हणून अनेक दिवसांपासूनची तरुणांची संकल्पना होती कि गावामध्ये इंटरनेट आणता येईल परंतु त्याला अनेक टेक्निकली आणि आर्थिक अडचणी आहेत. परंतु या गोष्ठीला खंबीर साथ मिळाली ती ग्रामपंचायत म्हसवंडीची. ग्रामपंचायत ने पहिले ग्रामपंचायत डिजिटल करू या ध्ययाने पुढाकार घेऊन काही आर्थिक मदत देऊ केली.
  गावातील तरुणांचे वैशिष्ट्य आहे कि जो ज्या क्षेत्रात काम करत आहे त्याचे थोडेफार योगदान गावासाठी देतोच आणि त्याच धर्तीवर इंटरनेट ब्रॉडबंड क्षेत्रात काम करण्यार्या म्हसवंडीच्या अक्षय जाधव, महेश बोऱ्हाडे, गौरव बोडके या तरूंनांनी चार दिवस टेक्निकली मेहनत करून गावच्या मळादेवी मंदिराच्या जवळ उंच ठिकाणी एक इंटरनेटचा मिनी टॉवर उभारला आणि त्याच्या मदतीने गावामध्ये अजून दोन रीसीव्हर डीव्हाइस जोडून ग्रामपंचायत पूर्णतः वायफाय-डिजिटल केली. आणि याच माध्यमातून याच इंटरनेट क्षेत्रात काम करण्यार्या म्हसवंडीचा युवा उद्योजक हरिष बोडके याने संपूर्ण गावासाठी फ्री वाय फाय देण्याचा नामस ठेवला आहे. सर्वच तरुणांनी यासाठी यथोचित प्रयत्न केले आणि आज याच सर्व म्हसवंडीच्या तरुंनामुळे संपूर्ण गावात वाय फाय सुविधा होत आहे.

मोबाईल नेटवर्कची अभाव असलेल गाव आज अहमदनगर जिल्ह्यातील पहिलं फ्री वाय फाय असलेले गाव झाले आहे. आजच संपूर्ण टेस्टिंग पूर्ण होऊन ते वापरासाठी सज्ज झाले आहे आणि येत्या १५ ऑगस्ट २०१७ योजी याचे लोकार्पण करण्यात येत आहे.  
आज खर्या अर्थाने गाव इंटरनेट च्या माध्यमातून डिजिटल झाले आहे. देशविदेशातून गावातील पर्यावरण व गावातील विविध कार्य  पाहण्यसाठी अनेक अभ्यासक येत असतात्त. आतापर्यंत दोन हजारहून अधिक देशाभरातून अभ्याससहली आणि तब्बल ४८ देशांच्या अभ्यासकांनी  गावाला भेटी दिल्या आहेत परंतु यापुढे येणारे अभ्यासक गावातूनच live उपडेट देऊ शकतील यात खरा आनंद आहे.

हे सर्व घडून येतंय तेथील नागरिकांमुळे, तरुणांमुळे, त्यांच्या विचारांमुळ, त्यांच्या एकीमुळे.
अशा विविध क्षेत्रात शून्यातून गरुडझेप घेऊन एका आदर्शवत गावाकडे वाटचाल करणारे असे हे म्हसवंडी गाव म्हणजे विकास आणि पर्यावरणरक्षण हातात हात घालून कसे पुढे जाऊ शकतात, याच एक उत्तम उदाहरण आणि त्याचा एक वस्तुपाठच म्हणता येईल.......!

  : - गणेश सातकर

रविवार, ३० जुलै, २०१७

एक क्षण....निवांत...उनाड..!

क्षण .....

ओंकारेश्वर ब्रिज,पुणे 

असं होत... जेव्हा आकाशात गर्द नभ दाटून येतात, जमिनीवरून नभाला साद घालणारी निळसर नदी आणि त्यासोबतीला तो सुंदर नजराना अनुभवणारे आपले नयन यांचे मनोमिलन एकाच वेळी होते....

अनेक आठवणी दाटून येतात,
मनावर त्या गर्द ढगांची सावली पडते,
मधेच त्यात हळूच गालावर स्मित हास्य उमटवनारी वाऱ्याची मंद झुळूक येते....कदाचित आपल्या जवळ अगदी काढावर जसे अगदी आपल्या अंगावर...!

कधी मधेच त्या काठावरच्या मंद हवेच्या आवाजातून दाटून येतात आठवणीचे अश्रू....
अचानक ओल्या अश्रुंवर पडतात कधीतरी नभांमधून वाट काढून आलेली ती सुंदर किरणे....
आणि त्यातून आपल्या त्वचेवर येणार अलगद शहारा...

आणि मधेच झालेला नभांचा कडकडाट आणि सुरु झालेली ती रिमझिम पुन्हा आपल्याला भानावर सत्यतेत आणून ठेवती.. आणि नेहमीच्या सत्य गोष्टींना पुन्हा सुरुवात होते...नव्याने...!

कदाचित असंच झालं  जेव्हा हा सुंदर क्षण जाणवला... आकाशात गर्द नभ दाटून आले तेव्हा...

✍गणेश





शुक्रवार, २३ जून, २०१७

गावरान शब्द

मी घाटी !!

आमच्या घाटावर जी बोलीभाषा आहे तीने मराठी भाषेला अनेक शब्द बहाल केले आहेत .
गावाकडे नियमीत वापरातले काही शब्द, तसेच आता फक्त वयोवृद्ध लोकं जे शब्द वापरतात असे काही शब्द  आम्ही संग्रहीत करन्याचा प्रयत्न केला आणि त्या शब्दांच्या अर्थांसह हे आपल्या समोर मांडताना आनंद होईल.

ही माहीती संकलीत करताना  " आपन म्हसवंडीकर " या आमच्या गावच्या व्हाट्स समुहाची फार मदत झाली .

माझा  घाटावरचा सोडुन मोठा मित्र परीवार आहे .
त्यांच्यासाठी तर अभ्यास करावी अशी माहीती आहे ही .

आणि काही मंडळी अशीही असतील ज्यान्नी कधीतरी हे शब्द ऐकलेले आहेत , बोललेले आहेत पण हल्ली ते असे शब्द वापरत नाही , त्यांना हा संग्रह बघून विशेष आनंद होईल .

अस्सल घाटी / पठारी  शब्द

१) मोक्कार - मुबलक , भरपूर
२) मायंदाळ - प्रचंड
३) केंदुळ - बराच वेळापासुन
४) कवाचं - कधीच , केंव्हाच
५) रेटुन -  जोर देउन
६) आवाळ - घट्ट
७) येळमाळं - दिवभर
८)कोड्यास - भाजी
९) त्यांठ - तीकडे
१०) लवान - खोलगट भाग
११) चिवाळ - अरुंद भाग
१२) पुचकान - बिनकामाचे
१३) चऱ्हाट - रस्शी , दोरी
१४) गुळचाट - गोड
१५) सवसान - सायंकाळ
१६) चावनाट - जिभेचे चोचले असलेला
१७) बादड - दव
१७) जिब्ड - जीप , कार
१८ ) पुराड -
१९) द्वाड -  वाईट
२०) थेंबाट - पाउस
२१) पहाळी / पाळ्ही - पावसाची सर
२२) वंगाळ - कुरुप
२३) बुरुंगाट - रीमझीम पाउस
२४) गदाळ - खराब
२५) वावार - शेत
२६)उली उली - जरा जरा
२७)ह्यांद्र - वेडा
२८) हेंबुड - वेडा
२९)इप्पारं - वेडपट
३०) म्होरं - पुढे
३१)जितराब - जनावरे
३२) बर्गडी - एक हाड
३३) कराळ - उतरता
३४) उत्याळ - उथळ
३५) सवसांच - संध्याकाळी
३६) पेताड - मद्यपी
३७) हेपास्ल - मस्तीखोर
३८) लपाटन -
३९) बर्हाणी - उडनटप्पु
४०) लुगड - साडी
४१) वटकावणं - तेकु
४२) सटमाळं
४३) रेमटावल , बदकावल - मारणे
४३) दोबाड - म्हैस
४४) खापुर्ड , शेपुर्ड - शेळी
४५) गावड - गाय
४६)यंगराट - वात्रट
४७) लुगारं - कमकुवत
४८) बंडी - शर्ट
४९) गुणोरोक -
५०) वट्टा - ओटा
५१) फोकाटी , शेमटी - बांबु
५२) झाड्याला - शौचाला
५३) निबार - वयस्कर व्यक्ती
५३) कव्हर - कीती वेळ
५४) वाताड - कड्क झालेलं
५५) दाभाड - तोंड
५६) फिंदार्ड , फिंद्री - मुलगी
५७) चघाळ - जनावरांच उरलेल अन्न
५८) भगुलं - पातेलं
५९) पीतळी - जेवनाचे ताट
६०) बैतवार - व्यवस्थीत
६१) येरवाळी - वेळेत
६२) औंदा - यावर्षी
६३) भलतुषा - खोडकर
६४) किडुक - साप
६५ ) मुंडीच्या काट्यावर - डोक्यावर पडणे
६६) वाखं , चिचकुळ - धारदार
६७) वाडगं - गोठा

संकलन - किरण बोडके

शुक्रवार, १६ जून, २०१७

Master's _सेमिनार

#Master's _सेमिनार.

मेघ मुलांची शाळा भरली शिक्षक त्यांचा वारा,
चला मुलांनो सेमिनारची सहल काढूया दिवस आहे बरा।।

वाऱ्यांसारखे PG- coordinator आमचे मेघांसारखे गाईड,
नभासारख्या रेपोर्टवर साईन नसतानाही घेई आमची साईड।।

वादाळासारखा External फाडफाड विचारू लागला Questioन,
वाऱ्याच्या मंदझुळुकी सारखे त्यांचे शब्द ऐकत होते आमचे कान काहीपण।।

गप्प बसून ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता आम्हा,
कारण माहित होते यासाठी शक्यतो यावे लागणार नाही पुन्हा।।

काहीच व्यवस्थित रिसर्च नसूनही सेमिनार देऊन येत आहेत सर्व,
जसे सुरु होणार आहे त्यांच्याच आनंदाचे नवे पर्व।।

शेवटी सर्वात महत्वाचे समाधान व आनंद आहे सर्वांच्या चेहऱ्यावर,
आता नाचत गात निघणार आहोत आम्ही आपापल्या वाटेवर।।

✍🏻गणेश सातकर

बुधवार, १० मे, २०१७

आठवणीतला एक दिवस ...आपला वाढदिवस

' आठवणीतला एक दिवस ...आपला वाढदिवस '

वर्षभरतला एकच असा दिवस असतो. 

जिथे हृदयात घर केलेले , मनाने खूपच जवळ असलेले , पण जवळ असूनही अंतर राखून असलेले ,
वर्षभरात कधीही न भेटणारे , न बोलणारे , आपल्यावर नजर राखून चुपचाप राहणारे ,
मनात आठवण काढूनही संवाद न साधणारे , ओळखीचे , अनोळखीचे...नेहमीच सहवासात असणारे , सतत बोलणारे , दूर असूनही संवाद साधणारे ,मनाला ओढ लावणारे , प्रेमाने राहणारे...
आपली आवर्जून आठवण काढतात .  आपल्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी.....शुभाशिर्वादांसाठी ...

एखाद SMS करून , किंव्हा फोनवर संवाद साधून किंव्हा प्रत्यक्ष भेटून ...बोलून.. 

तो शुभदिन म्हणजे आपला वाढदिवस .  खरंच अश्यावेळी मन भरून येतं. ...भरल्या आभाळागत ...!
किती हे प्रेम !
 सरत्या पावसाच्या सरींसारखं तन-मन अगदी भिजून जातं ह्या प्रेमाच्या वर्षावात .

नव्या आश्या , नव चेतना पल्लवित करतं. खरंच धन्यता वाटते मनाला ....एक दिलासा मिळतो एकप्रकारे .
तरीही त्यातल्या त्यात कुणी जिवाभावाचं राहीलच एखादं...तर मन खट्टू होतं. हे काही वेगळा सांगायला नको.

वाढदिवसाच्या आधीच पासूनच काहीएक दिवस एक चित्र डोळ्यसमोर उभं राहतं.
किंव्हा आपण ते रंगवलेले असत . अमुक अमुक अस असं होऊ शकतं .
किंव्हा व्हायला हवं. अन त्यानुसार आपण आनंदाच्या विविधरंगीत छटा आपल्या अंगा खांद्यावर खेळवत , इकडून तिकडे सैरवैर बागडत असतो. 

वाढदिवसाच्या वेळी अश्या ह्या प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव होत असताना मन आनंदाच्या लहरी सुगंधामधे   स्व:तहा हरवून जातं .  कारण वर म्हटल्या प्रमाणे ........

कधीही न बोलणारे , न भेटणारे , आपलेच जीवाभावाचे, आपली वर्षभरातुन एकदा का होईना आपली आवर्जून आठवण काढतात . हीच बाबा मनाला स्पर्शून जाते .
आयुष्यात दुसरं तिसरं अजून काय हवं असंत. प्रेमाचा एक चतकोर हि आनंद फुलवण्यास पुरेसा असतो.

असा हा आनंदाचा दिवस .... प्रत्येकाच्या जीवनात वर्षभरातून एकदाच येतो ...आठवणीचा अन शुभेच्छांचा वर्षाव करत ... माझा तर येऊन गेला 22 मार्च...आपलाही येईल अशीच आशा,अपेक्षा आणि समाधान घेऊन.

आपल्या आई वडलांची हि एक मोठी देणगीच आहे. त्यांचेच सर्वप्रथम मनोमन तरी चरण स्पर्श करायला हवे. 

असंच लिहिता लिहिता.....!

✍🏻गणेश ....

गुरुवार, ३० मार्च, २०१७

आपुलकी मायेची

#आपुलकी_मायेची

एखाद्यादिवशी खिशाला पेन नसला म्हणजे दिवसभर काहीतरी हरवल्यासारखं होतं,
माणसाचंही भलतच आहे हा, नाही म्हणजे आयुष्यात कोण कधी कशी जागा व्यापुन घेईल सांगताच येत नाही, मग ती सजिव असो वा निर्जिव. यात अट फक्तं एकच माणसाचं हृदय सजिव असलं पायजे, जिवंत. मग समोरच्या गोष्टीचं अस्तित्व तो मान्य करतोच करतो!!....

लहानपणी एखाद्या गोष्टीच्या हव्यासापोटी घरात तांडव करूनही प्लॅन सक्सेस होत नाही अस दिसताच (म्हणजेच एखादी गोष्ट पाहिजेच आहे आणि ती सर्व काही करून मिळत नाही असे दिसताच ) मी माझ जवळचं हक्काचं आधारकार्ड बाहेर काढायचो, ते म्हणजे काही झालतरी रात्री जेवायचं नाही.....
        

रात्र झाल्यावर भुकेमुळे कधी ह्या कडेवर तर कधी त्या कडेवर लोळलाळ सुरू व्हायची..पोटात पडणार्‍या भुकेच्या आगीने न राहवून अर्ध्यारात्री सर्व झोपलेत अशी खात्री करून मी उठून बत्तीच्या(चिमणी) प्रकाशात भाकरीचे टोपले चाचपाडायचो. तोच, टोपल्यात व्यवस्थित वरून फडक्याने झाकून एक ताट वाढून ठेवलेलं दिसायचं.  मी घास दोन घास खात नाही तोच कुणाचेतरी हात डोक्यावरून मायेनं फिरायचे, .. नजर वर करून बघायचो तर आई किंवा आजी  बाजुला बसलेली दिसायची.

         पोटचं मुल ज्या दिवशी रागारागाने जेवलं नाही खरं सांगतो त्यादिवशी त्याच्याबरोबर घरातल्या माय माऊलीच म्हणजेच आपल्या आईचे पोटही खपाट आहे म्हणुन समजायचं.  आता थोडी समज आल्यानंतर मी हे बोलतोय, अनुभवतोय आणि समजतोय सुद्धा.

माझी आई पण माझ्या बरोबर जेवायची, माझ्याबरोबर ताटात जेवायला लागली की ती वस्तु मिळाली नाही त्या दुःखाने म्हणा की आईच्या मायेने म्हणा डोळ्यातले एक दोन अश्रु ताटात पडायचे, त्याने जेवण्याची चव कधी बदलली नाही उलट अधीकची चव यायची. डोळे डबडबून ताटातली भाकर बत्तीच्या मंद प्रकाशात धुसर होऊन पण डोळ्यातच मोत्यासारखी चमकायची.

परंतु आज खंत एकच आहे कि आज बरेच वर्ष मी बाहेर आहे. तरीही  मला खात्री आहे आजही मी कधी असा झोपलो तर आई तशीच उपाशी राहील माझ्यासाठी ह्यात दुमत नाही....!

थोडा भावनाविवश झालो आहे. होतो कधी-कधी असा मी....
असो....!

    माईची माया अफाट असते ती माझ्यासाठीच नाही तर प्रत्येक आईची आपल्या मुलासाठी. बसमध्ये बसलोय, समोरच्या सिटवर एक आई आपल्या लहानशा गोडूल्या बाळाला खिडकीतून बाहेरचा नजारा दाखवत पॉपकॉर्ण  खाऊ घालतेय, हे दृश्य बघून अचानक आईची आठवण झाली. अवघडच आहे माणसाच् कधी काय आठवेल सांगताच येत नाही....!

शेवटी एकच,
राग नको....लोभ हवा.....!

✍🏻 गणेश सातकर

बुधवार, २९ मार्च, २०१७

आजाराची कणकण आणि घरचे प्रेम

#आजाराची_कणकण_आणि_घरचे_प्रेम

मागचे तीन चार दिवस जरा नाशिकला गेलो होतो.(24, 25,26 मार्च)  दोन दिवस सीपीजिकॉन कॉन्फेरंस होती, ते थोड काम  आणि त्याच अनुषंगाने रविवारी तिसर्या दिवशी जरा नाशिक दर्शन घेतले. यायला सोमवारची पहाट उजडली जवळजवळ पाच वाजले. त्यामुळे त्या तीन चार दिवसात खूप धकधक झाली. परत सोमवारी झोप न होताच परत प्रोजेक्टचे काम त्यामुळे संध्याकाळी खूप कणकण जाणवायला लागली. अर्थात थोडीशी झोपेची आणि आरामाची गरज होती म्हणा.

दुसर्या दिवशी गुडीपाडवा होता, म्हणून घरच्यांनी फोन केला नेहमीची विचारपूस केली परंतु माझा थोडासा बदललेला आवाज ऐकून त्यांनी लगेच ओळखले कि जरा आजारी पडलो आहे म्हणून. त्यावरूनच थोड....

आजही आजारी पडलो म्हणजे आई वडिलांची आणि आजीची  आठवण येते..त्यांच्या नुसत्या जवळ असण्याने का कुणास ठाऊक भक्कम आधार होतो.. ते गावी असतात, परंतु  नुसता आवाजात झालेल्या बदलावरून आई फोनवर म्हणते, ' दवाखान्यात जाऊन ये बाळा ' (नेटवर्क प्रोब्लेममुळे फोन नेहमी लाउडस्पीकर वरच असतो)  आणि तिथेच जवळ असलेले वडील म्हणतात त्याला म्हणावं डॉक्टर कडे जा, चांगल तपासून घे, पैशाक नको पाहत बसू जाऊदे गेले तर.  त्याच वेळी आझ्या आजीला कळल्यावर आजी लगेच म्हणते त्याला म्हनाव अंगावर दुखन काढू नको, सवय आहे त्याला ,तसा आजारी पडत नाही पण  मग एकदा आजारी पडला म्हणजे तो लवकर उठत नाही..आणि जरा पोटभर खात जा म्हणाव...

आजारी असलो म्हणजे दिवसातून दोन तीन वेळा त्यांच्याकडून फोनवर विचारपूस होतेच, मग भलेही नॉर्मल काहीहि झाले असेल तरी. त्यामुळे मी कधी आजारी असलो तरी घरी सांगत नाही उगाच नको काळजी यामुळे. परंतु त्यांना असे समजल्यावर ते मात्र काळजीत असतात.

सहज मनात एक प्रश्न डोकावतो, आईवडील आजारी असले म्हणजे आपण इकडे काळजी करू नये म्हणुन कधीच आपल्याला सांगतही नाहीत. कधी फोनवर तस जाणवू देत नाहीत. सहज कुठल्यातरी मित्राकडून कळतं की अरे आज "मामी आणि दादा " दवाखान्यात दिसले होते, तब्येत बरी नाही काय? ..
या त्यांच्या प्रश्नावर आपणच गोंधळून जातो. कॉल केल्यावर सांगतात, विशेष काहीच नाही अंग जरा कणकण करत होतं म्हणून डाॅक्टरांना दाखवून घ्यावं म्हंटल, इतकच्. 
अन आपण बसतो टिचभर दुःख त्यांच्याजवळ इवळत.......!

माझ्या मते माझ्यासारख्या अनेकांच्या बाबतीत हीच अवस्था असेल. कदाचित एक संभ्रमअवस्थाच म्हणा ना.

शेवटी ती आपल्या घरच्यांची आपल्याप्रती एक आपुलकी असते आणि निर्मळ , सोज्वळ प्रेम असते कुठेही न मिळनेजोगे.......!

✍🏻 गणेश सातकर

बुधवार, ८ मार्च, २०१७

माझे दहावीचे अविस्मरणीय क्षण.......!

माझे दहावीचे अविस्मरणीय क्षण.......!

काल सकाळी नेहमीप्रमाणे PMT बस ने जात होतो, खूप गर्दी होती, मला बसायला जागा काय मिळाली नाही मग समजले कि दहावीच्या परीक्षेची सुरुवात होत आहे.त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी होती ती.
सर्व विद्यार्थी परीक्षेच्या टेन्शनमुळे खूपच निराश दिसत होते परंतु त्यांच्या सोबतीला त्यांचे पालक कोणाची आई तर कोनाचे वडील असे चित्र होते.  परंतु आता आज संध्याकाळी अजिबात गर्दी नाही मग बसल्याबसल्या विचार आला कि इथ शहरामध्ये पालक किती मुलांची काळजी करतात ते..!  

माझा दहावीचा काळ मला आठवला... ते परीक्षेच्या गमतीजमती आठवत आहे....शाळेच्या त्या रम्य आठवणी आठवत आहेत...!
साधारण आठ वर्षापूर्वी माझ्या परीक्षेचा पहिला दिवस आठवला. इतरांपेक्षा खूप वेगळा होता.
खरतर फक्त परीक्षेचा काळ आणि त्याची आठवण इतकच लिहायचं हाच विचार होता  परंतु त्या दहावीच्या आठवणीच इतक्या आहेत कि थोडासा आढावा घ्यावा वाटला आणि त्यानंतर परीक्षेचा काळ वर्णन करावा वाटतो आहे.............!


खरतर आपल्याकडे दहावीला सर्वात जास्त महत्व आहे. जीवनाला कलाटणी देणार वर्ष म्हणून दहावीला समजल जाते. पालकांपासून ते विद्यार्थ्यापर्यंत त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील थोडा वेगळा आहे.
मला माझे ते रम्य दिवस अजूनही आठवत आहेत. माझी शाळा होती श्री. रोकडेश्वर विद्यायल आंबी दुमाला, ता- संगमनेर जि- अहमदनगर. तिथ दहावीच्या वर्गाची स्पेशल खातरदारी घेतली जायची.

दहावीला गेल कि आम्हांला सुरु व्हायचे ते शाळेचे एक्ष्ट्रा तास. शाळा उघडायच्या अगोदरच १५ दिवस आमची शाळा चालू व्ह्यायची.    दहावीला वर्ग हि स्पेशल असायचा अगदी शाळेच्या ऑफिस ला लागुनच. त्याच कारण देखील तितकच भारी म्हणजे थोडी जरी बडबड गडबड गोधळ सुरु झाला तर लगेच समजेल आणि मग येऊन मुलांची धुलाई.

आणि याच बरोबर दुसर देखील त्याला कारण ते म्हणजे थोडा वेळ जरी एखादा शिक्षक वर्गात आला नाही तर लगेच दुसरे शिक्षक सहजगत्या येऊन शिकवण चालू करायचे म्हणजे मुलांना थोडाही मोकळा वेळ न देणे.
आमचा दहावीचा वर्ग थोडा छोटा होता आणि त्याट जरा अंधारही, परंतु पारंपारिक वर्ग होता तो, सगळ्यांचा त्या वर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा असायचा. बाकी लहान वर्गाचे विद्यार्थी तर तिकडे फिरकत पण नसायचे.

नेहमीप्रमाणे मी पहिल्याच बेंचवर बसायला जागा घेतली. त्यात मी जरा बारीक आणि बर्यापैकी हुशार ( इतका नाही ) होतो त्यामुळ मला कुठेही बसवलं तरी नंतर पुढेच घ्यायचे.
दररोज सकाळी ७ वाजता आमच डेली रुटीन चालू ह्यायचे ते संध्याकाळी सहा वाजता घरी.
७ वाजता घरून निघणे ५ ते सहा किलोमीटर सायकलवरून प्रवास मग ८ वाजता इंग्रजीचा पहिला एक्ष्ट्रा तास त्यानंतर ९.३० ला गणिताचा तास आणि मग शाळा भरायची ते ५ वाजेपर्यंत. कधी – कधी नंतरही इंग्रजीचे तास व्हयाचे म्हणजे घरी जायला ६ वाजायचे.

सकाळी इंग्रजीचा तासाला खूप गंमत यायची. झावरे सरांना थोडा यायला उशीर झाला तर मुल खुश व्हायचे वाटायचे आज काय येत नाहीत परंतु ते यायचेच मग सगळे निराश. त्यामागे कारण देखील होत .
इंग्रजी सगळी डोक्यावरून जायची. Change the voice ,add question tag, direct – indirect हे असे सगळे व्याकरण पोरांची झोप उडवायची, तरी काही कधी शेवटपर्यंत कळल नाही .  तरी ते खूप भारी लहान होऊन हसी मजाक करून शिकवायचे. म्हणून कुठे तरी पास व्हायला मदत झाली.
शेलार सरांच्या मराठीच्या तासाला येणारी झोप. आणि त्यात माझा मित्र आणि मी त्यांच्या तासाला खात असलेलो लेमन गोळ्या.

शिकवन्या अगोदर धडा आम्हाला वाचायला सांगणे असो..सगळ अविस्मरणीय. फक्त धड्याचे नाव बदलून तोच तोच वर्गपाठ दाखवणे असो किंवा त्यांच्या  शिकवणी डेस्क अगदी आमच्या बेंचच्या समोर घेऊन त्याखाली वाकून जोक्स करणे असो सगळ आज आठवतंय.

विज्ञानचे शिक्षक कापूसकर सर आमचे क्लासटीचर होते. नेहमी त्यांचा पहिला तास असायचा. हुशार सर होते पण आम्हाला कधी त्यांनी शिकवलेले कळलेच नाही. त्यांच्या तासाला आम्ही वर्गपाठ पूर्ण करत असायचो. प्रश्न अगोदर लिहून आणायचो आणि ते जेव्हा हा महत्वाचा मुद्दा आहे लिहून घ्या म्हणायचे तेव्हा आम्ही ते उत्तराच्या ठिकाणी लिहायचो. एक प्रकारे त्यांना फस वायचोच म्हणा.

सगळ्यात भारी त्यांची गोष्ठ होती तीम्हणजे घरी राहिले कि application द्यायचे. मग आम्ही त्याचा खूप फायदा उठवायचो. घरी राहायचे असेल तर दुसर्याकडे आजारी असल्याचे अप्लिकेशन द्यायचे. सर पण खूप हळवे होते. थोड त्यांच्यासमोर रडल कि लगेच सोडून द्यायचे.

गणिताचे शेळके तर खूप पोटतिडकीने शिकवायचे पण आम्ही त्याचा गैरफायचा घेतला. त्यांनी त्यांचे काम सोपे व्हावे म्हणून पाच - सहा जरा हुशार जणांना तपासनीस बनविले म्हणजे जे कोणी दुसरे विद्यार्थी  गणितचा अभ्यास करतील त्यांचे चेक करायचे आता त्यात मीही होतो.

आणि आमच्या तपासणीसांचे चेक करायला एक मुलगी ठेवली होती. आता आम्ही कधी ते गणिते लिहीतच नव्हतो किंवा तसा अभ्यास करतच नव्हतो. त्यामुळे दाखवण्याचा त्या मुलीला प्रयत्न कधी आम्ही केलाच नाही तिला ही  वाटत असेल हे पण तपासनिस आहे त्यामुळे यांनी लिहले असेल यामुळे गणिताचा अभ्यास काय कधी जास्त झालाच नाही आणि त्याचा फटका परीक्षेत नक्की बसला.

रोकडेश्वर विद्यालय हे नाव घेतलं तर एक समीकरण होत आणि आहे ते म्हणजे मिंडे सर. आज शाळेतून शिकून गेलेला प्रत्येक विद्यार्थी या सरांचे नाव काढत नाही असे होणार नाही.
तसा मी या सरांचा लाडका विद्यार्थी होतो. हिंदी आणि इतिहास शिकवायचे.  अतिशय कडक शिस्त. सगळ्या शाळेत त्यांचा दरारा होता. एका नजरेत सर्व शाळा स्तब्ध करण्याची त्यांची ताकद होती. त्यांच्या तासाला एकदम सरळ बसायचे , नाकावर माशी जरी बसली तरी हालचाल नाही जांभळी तर मुळीच नाही. नुसतीच कडक शिस्त नव्हती तर शिकवण्याच्या बाबतीतहि तितकेच चांगले.

मुलांच्या कविता तर अर्थासकट पाठच असायच्या परंतु सगळे धढे सुद्धा तोंडपाठ असायचे आजही माझे हिंदीचे अनेक पराग्राफ तोंडपाठ आहेत. हि त्यांचीच किमया आहे.
हे झाले विषयांच्या शिक्षकांबद्दल परंतु कधी जर कुठे क्रिकेट खेळताना जरी दिसलो किंवा तशी त्यांना टीप जरी लागली तरी प्रार्थनेला काही खैर नसायची.

इंग्रजीची दर आठवड्याला होणारी टेस्ट आणि मग सर्वांपुढे बाहेर काढून पक्के बदाडून काढायचे हि तर अविस्मरणीय आठवण. त्याच वेळी इतर शिक्षक देखील हाच तो अजून माझ्या वाट्याचे दोन फटके मारा असे म्हणायचे तेही सगळी शाळा पुढे ग्राउंड मध्ये बसली असायची तेव्हा. खूप लाज वाटायची आणि वाईट पण वाटायचे.

म्हणजे एक गोष्ट नक्की आणि आमच्या पाचवीला पुजलेली असायची ती म्हणजे मार..मार..मार...आणि मारच.
परंतु  सगळ्यात महत्वाची गोष्ट हि होती कि कितीही मारले तरी घरी सांगता येत नव्हत आणि तसे केलं तर आणखीच मार पडायचा.
परंतु आता जरा परिस्थिती वेगळी झाली आहे असे माझे म्हणजे आहे. पालक नाजूक झाले आहे आणि तशी खंत देखील शिक्षकांनी व्यक्त करून दाखवली आहे.
दहावीला होतो तरी आमच्या शाळेत हाफ चड्डीच होती. जरा मोठे समजायचो आम्ही आम्हाला त्यामुळ खूप  लाज वाटायची.


कधी टाय फक्त प्रार्थनेपुरता फक्त बटनात अडकवून द्यायचो तर कधी बूट घातले नाही तर पायाला बँडेज बांधून मार वाचवायचो व्हा दहावीच्या गंमती. परंतु मिंडे सर जर चेक करायला असले कि सगळ बाजूला ठेऊन गप गुमान मार खाऊन घ्यायचा. कारण त्यांचे  काय सांगता येत नव्हते कधी बँडेज पट्टी काढायला लावतील आणि काय करतील.

PT चा तास सोडला तर आम्हाला कधी ground वर खेळायला किंवा कशालाच नेत नव्हते.  शनिवारी सकाळी PT चा तास असायचा त्या तासाला कवायती व्हायच्या, मी दहावीला असताना मला त्या तासाला   सगळ्या शाळेच्या पुढे सर्वांना गाईड करायला उभे करायचे. कधी कधी एखादा कवायत प्रकार मधेच हात वर करून थांबवून ठेवायचे त्यावेळी मला काय हालचाल करायला चान्स नसायचा सर्वात अवघड परिस्थिती तेव्हा व्हायची. अविस्मरणीय आठवण.

दहावीला असताना सहामाई परीक्षेत आम्हाला २० पैकी तोंडीचे मार्क्स होते परंतु ते आमच्या शिक्षकांनी मुद्दाम दिले नाही. कारण टक्केवारी कमी मिळावी आणि त्यातून मुल अभ्यास करावी.
तेव्हा तरीही मला ६५ टक्के मार्क्स होते ते ८० पैकीच म्हणा पण पूर्णपणे गोंधळाची अवस्था झाली होती कारण काहीच कळत नव्हते ते मार्क्स न दिल्यामुळे.

चौथा पाचवा नंबर आला असेल सहामाई परीक्षेत पण या घोळामुळ कोणाच्या निदर्शनास नाही आलो.
सगळ्यात भारी किस्सा तर असायचा दहावीचा फॉर्म भरण्याचा पहिले फोटोग्राफर कडून शाळेत फोटो काढायचे मग तो फॉर्म भरताना त्या सरांच्या सूचना ... अक्षर चौकटीच्या बाहेर गेल नाही पाहिजे आणि एखाद्याचे गेल तर लगेच त्याला मोकार मारायचे.
वेगळीच दुनिया होती ती.


सराव परीक्षा असायची. तोंडी परीक्षेचे मार्क्ससाठी डबल चाचणी परीक्षा व्हायची. विज्ञानाच्या प्रक्टिकल परीक्षेला आदल्या दिवशी सगळी सेटलमेंट होऊन कुणाचा मोठा प्रयोग कोणता आणि कोणाचा छोटा प्रयोग कोणता सगळ काही फिक्स असायचे. प्रयोगशाळेत दुर्बिणीखाली काही दिसत नसले तरी सर मला बोलवून म्हणायचे बघ काहीतरी हालचाल करत आहेत ते क्षुक्ष्मजिव आहेत मीही हा म्हणायचो खर तर मला काहीच त्याखाली दिसत नसायचे.

सिलॅबस तर कधीच संपवून व्यायचा मग चालू व्हायची सगळ्यांची रिव्हिजन.
परीक्षेच्या अगोदर प्रत्येक विषयाला बोलवायचे ते गेस्ट लेक्स्चर देणारे शिक्षक. त्यांचे मार्गदर्शन, बोर्डला पेपर कसा असतो, कसा लिहायचा, कुठ प्रश्न क्रमांक टाकायचा तर कुठ रेषा मारायच्या इतपर्यंत सांगितलं जायचे.
सर्वात जास्त आज हसू येणारी गोष्ठ म्हणजे पेन बदल्यावर वर पण सही घ्यावी असे सांगणे. आणि तसे आम्ही करयचो देखील.

आमच्या सेंडअप च्या दिवशी अनेक वर्षातून   ठेवलेली आमची गॅदरिंग आणि त्यावेळी आम्ही केलेली मजा आजही आठवते.
असो ................
शेवटी एक गोष्ठ नक्की होती कि सर्म्पूर्ण वर्षभर अगदी घासून पुसून हाणून मारून इतक तयार केलं होत कि विद्यार्थी हा परीक्षा देण्यासाठी परिपूर्ण झाला होता.
आता वेळ आली होती परीक्षेची.
.......................
प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा म्हटले तरी हरकत नाही.
पहिल्यांदाच सामोरे जात होतो.माझ्याप्रमाणेच सर्वांच्याच मनात धाकधूक होती.
तसा बर्यापैकी अभ्यास झाला होता. परंतु घरातील सर्वाची माझ्या अभ्यासाप्रती आसक्ती असायची.
घरचे सर्व माझ्या अभ्यासात काही व्यत्येय येणार नाही याची काळजी घ्यायचे.  गायीचे दुध काढणे असो,किंवा घास कापणे , गायींना चारा घालणे हे कामे मी करायचो परंतु कुठलेही काम त्यावेळी करायला देत नव्हते. यांसारखे इतरही किरकोळ काम माझ्यासाठी तात्पुरते बंदच केले होते.

आजोबा त्यावेळी सप्ताहाला गेले होते त्यामुळे त्यांची खोली मला अभ्यासाला दिली होती. मग मी कुठेतरी बघितल्या प्रमाणे ज्या खाटेवर झोपायचो त्याच्या अगदी समोर भिंतीवर अभ्यासाचे थोडेफार रंगवले होते. एक वेळापत्रक तयार केले होते. ( परंतु ते कधी पाळले नाही ). भिंतीवर रेनुसुत्रे लिहिले होती ,संज्ञा होत्या , काही गणिताची सूत्रे अशी लिहून ठेवली होती जर कुणी आले तर वाटायला पाहिजे कि भरपूर अभ्यास चालू आहे असे.
आजही पहिल्या पेपरची गोष्ट आठवते, पहिल्या पेपरच्या अगोदरच्या दिवशी वडील कामाच्या निमित्ताने चार-पाच दिवस बाहेर गेले होते. दुसर्या दिवशी माझा मराठीचा पहिला पेपर होता.


आमची सामायिक विहीर आहे. त्या दिवशी आमची शेताला (कांद्याला ) पाणी भरायची बारी (वेळ ) होती. रात्री दोन वाजता लाईट येणार होती. त्यावेळी मोटार चालू करणे गरजेचे होते. आता वडील घरी नसल्यामुळे आईलाच हे सर्व कराव लागणार होत. तेव्हा आईला सोबती म्हणून मी रात्री दोन वाजता मोटार चालू करून पहाटे पाच वाजेपर्यंत आईला  पाणी भरू लागलो म्हनण्यापेक्षा वाफा भरला कि सांगायचे कि बारे द्या अस माझ काम होत.आणि त्याही पेक्षा सोबतीला होतो हे महत्वाच. तेव्हा बत्तीच्या वर आडवा डब्बा लावून बनवलेली एक बॅटरी  माझ्याकडे  आणि चार्जिंग ची बॅटरी  आईकडे होती हे आजची मला आठवतय.

पहाटे पाच वाजता घरी येऊन अंघोळवगेरे करून पुन्हा थोड वाचून लवकरच मित्राच्या गाडीवर बसून परीक्षा केंद्रावर आलो .
भरपूर सारे मुल बघून मी अधिकच डिप्रेशन मध्ये गेलो होतो. वेगळाच नजरा होता. गेटवर एकदा चेकिंग वर्गात गेल्यावर एकदा चेकिंग म्हणजे कॉपी करण खूपच अवघड आणि तसेही कॉपीचा आणि आपला कधी दूरदूर पर्यत सबंध नव्हता खूप घाबरायचो त्यामुळ खूप भयावह असे वातावरण म्हटले तरी हरकत नाही.
नंबर कुठे आहे हे पाहण्याची धावपळ तर आपल्या वर्गात आपल्या शाळेचे कोण आले आहे याची उत्कंठा. दोन चार चांगले पेन,वरून कंपास व्यवस्थित सगळ्या साहित्याने भरलेली त्याच्या सोबतीला पॅड म्हणजे अगदि पाकिस्तान वर सर्जिकल स्ट्राईक करायला जायचे आहे अशी पेपरची ती  तयारी.

उत्तर पत्रिका आल्यानंतर त्यात नंबर व्यवस्थित लिहणे असो किंवा मराठीच्या पेपर मध्ये आलेला माझ्या आवडाच्या विषयावर म्हणजेच पर्यावरण व निसर्गावर निबंध आजहि  आठवतोय. त्यात घरात पाणलोट क्षेत्राचे आणि पर्यावरणावर अनेक पुस्तके होती, तेही वाचलेली होती त्यामुळे त्यातील दोन कविताही लिहिल्या होत्या त्या आजही आठवतात.

‘हिरवे हिरवे शिवार सारे पिवळे पडून गेले
आभाळ पेलणारे सारे पक्षी उडून गेले
दुर्भाग्य या फुलाचे माळी असा मिळाला
वेळी तोडण्यास तो आज सिद्ध झाला’.
हि पेपर मध्ये लिहिलेली कविता आजही आजची स्मरणात आहे.

त्याहीपेक्षा पर्यवेक्षकांनी मागितलेले आय डी कार्ड आणि आम्ही दाखवलेले परीक्षेचे हॉलतिकीट याचा किस्साही आठवतो कारण आमच्या शाळेला आय डी कार्ड हे नव्हतेच आणि आम्हला आय डी कार्ड काय असते हे माहीतच नव्हते मी हॉलतिकीटलाच ते समजायचो. अशी माझी किंवा आमची  दुर्दशा .

पुढे जाऊन तरशेवटी उत्तरपत्रिकेवर लावलेला बारकोड आणि होलोग्राफ काय असते किंवा कशाला काय म्हणतात किंवा यातील फरक काय काहीच कळत नव्हते. फक्त सर्व भारी,नवल आणि काहीतरी वेगळ वाटायचं.
इतिहासाच्या पेपरला आमच्याच शाळेचे आलेले शिक्षक शेलार सर आणि त्यामुळे आनंदी झालेलो आम्ही कि आता आम्हाला सुट भेटणार एकमेकांचे पाहता येणार परंतु तसे काहीही न झाल्यामुळ आमचा झालेला भ्रमनिराश देखील आठवतो.

इंग्रजीच्या आणि गणिताच्या पेपर ला असलेले a.b.c.d  सिस्टीम त्यामुळ कोणत्या पेपर मध्ये काय याची पेपर झाल्यावर उत्सुकता किंवा भरारी पथक आणि स्कॉड आले हे दररोज चार वेळा कोणाकडून तरी ऐकायचो मात्र प्रत्यक्षात दर्शन मात्र त्यांचे कधी झाले नाही.
इंग्रजीचा एक पाठ केलेला निबंध तोच फिरवून फिरवून लिहिलेला असो किंवा त्याच पेपरला भाषांतर करा मध्ये टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे नियम आलेले असताना झालेला आनंद असो कारण ते  सगळे नियम माहित होते इंग्रजी नाही आली तरी काही हरकत नव्हती.


घरी आल्यावर पेपर चेक करून काय चुकल काय बरोबर हे पाहणे असो किंवा  येत असूनही एखादे उत्तर चुकीचेच लिहिले गेल्यावर मनाला झालेला पश्चताप असो सगळ वास्तववादी होत.
त्या काळात जास्तकरून आमची tv बंद असायची   परंतु संध्याकाळी काही काळ घरचे चालू करायचे आणि मालिका पाहायचे. मला अभ्यासाला दुसरी खोली दिली होती परंतु माझ काही मन लागत नसायचे. मी निवांत कडी लावून झोपून घ्यायचो. जेवायच्या निमित्ताने भरपूर वेळ tv पाहायचो. तेव्हा ‘मेहेर’ हि मालिका असायची खूप हिट होती मलाही आवडायची म्हणून मी जेवणाचा बहाणा करून अर्धा तास मालिका पाहत जेवण करायचो हि सुद्धा एक न विसरता येण्याजोगी आठवण आहे.


पेपर ला जाताना एक दिवस मित्राची बंद पडलेली m-80 आणि मग परत दुसर्या मित्राच्या गाडीवर जाताना देखील त्याच्या सायलन्सर मधील पडलेली नळी आणि आम्हाला झालेला उशीर ,त्यात गेटवर न चेक करताच सोडलेला आनंद आणि खूप लेट झालो आहे याची भीती खूप त्रासदायक होती. अक्षराच्या बाबतीत तर कुत्र्याचे पाय मांजराला असे होते परंतु तरी हळूहळू लिहून अक्षरावर रेषाही न देता लिहिलेले पेपर आठवतात.
पेपर देऊन आल्यावर हुशार मुलांकडून उत्तरांची खात्री करून, याला त्याला हे लिहील का ते लिहील का हे विचारण्याची मजाहि  काही औरच होती.
शेवटच्या पेपरच्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा चालवलेली मोटारसायकल हि अविस्मरणीय आहे.
परीक्षा संपल्यावर सर्वांच्या अगोदर लागलेल्या त्या सुट्ट्या आणि आता फक्त मजा करायची क्रिकेट खेळायचे ,पोहायचे याच स्वप्नात ,आनंदात डोक्यावरचे कमी झालेले ते कोवळ्या मनातले ओझ. याची कल्पना आज मितीला मीही करू शकत नाही कारण ते खूप सुखदायक होत.


म्हनजेच  सर्वात महत्वाचे वर्ष एका प्रकारे लीलया पेलले याची ती अनुभूती असावी.
बर्याच दिवसाच्या सुट्ट्यांनंतर दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली.  सर्वजन टेन्शनमध्ये यायला लागेल ....नक्की काय होईल त्या मनाचा आता विचार आपण करू शकत नाही.
निकालाचा दिवस आला. सकाळी ११ वाजता online जाहीर होणार होता. त्याच दिवशी दुपारी शाळेत तो मिळायचा कारण श्रीरामपूर या विभागीय कार्यालयातून हार्डकॉपी येत असल्यामूळ थोडा शाळेत निकाल यायला वेळ लागायचा.
आदल्या दिवशीच दोन तीन  नातेवाईकांची सीट नंबर मागून घेतला होता.
सकाळीच निकाल पाहायला बोट्याला (जवळच गाव ) गेलो. तिथ दोन ठिकाणी १० रुपयाला निकाल सांगायचे.
मी वडिलांचा फोन बरोबर आणला होता. आत्याच्या मुलाला निकाल बघायला सांगितला होता. ११ वाजता निकाल लागला, निकाल पाहायला भरपूर गर्दी तिथे होती ,माझे अनेक मित्रही होते. परंतु सर्वर डाऊन झाला होता त्यामुळे अधिकच वेळ लागत होता.


आम्ही मित्रमंडळी निकाल पाहायला त्या नेटवाल्यासमोर उभे होतो. मनात प्रचंड धाकधूक होती. जर कुणी विचारले तर ८० टक्के मार्क्स मिळतील असे मी संगायचो परंतु त्याची मला खात्री देता येत नव्हती. हळूहळू निकाल समजायला लागले. परंतु माझा नंबर काही लागला नव्हता.
तेव्हड्यात आत्याच्या मुलाचा फोन आला. मी फोन उचलला. तो बोलला किती मार्क्स पडले असतील ?
मी बोललो नक्की नाहि सांगता यायचे किती ते ...!

मनातून खूप घाबरलो होतो. छाती धड धड करायला लागली होती.
उत्सुकता शिगेला पोहचली होती.
त्याने विचारले तरी किती?
मी थरथरच उत्तरलो ऐंशीच्या आसपास पडायला पाहिजे....!
तो बोलला एक काम कार आधी पेढे घे पेढे....
पंच्याऐशी (८५) टक्के मार्क्स मिळाले आहेत.
मला विश्वास बसत नव्हता.

मी त्याला परत नाव व्यवस्थित चेक करायला सांगितले. तरी तो होच बोलला.
परंतु म्हणतात ना कानात आणि डोळ्यात चार बोटाचे अंतर असते त्यामुळे विश्वास पाहिल्यावरच होईल.
काही वेळ थांबलो आणि शेवटी प्रिंट काढून पाहिले. खरच ८५.६९ टक्के मार्क्स मिळाले होते.
मला विश्वास बसत नव्हता सगळा निकाल व्यवस्थित दोन वेळा चेक केला आणि मी थोडा स्थिरावलो मला विश्वास बसला. माझा आनंद गगनात मावत नव्हता. लगेच देवाला हात जोडले देवाचे आभार मानले कारण खूप मार्क्स पडले होते. अपेक्षेपेक्षाहि जास्त. मी खूप खुश होतो ,इतरांना किती आहे किंवा किती नाही याचा विचारही नव्हता.
माझ मन सैर भैर धावत होत. मी माझ्यामधेच खूप खुश होतो.


थोडा वेळानंतर इतर माझ्या मित्रांना त्यांचे मार्क्स विचारू लागलो. थोडे माझ्यापेक्षा कमी होते परंतु कमी जास्त असा काही भेदभाव मी करत नव्हतो कारण मी माझ्या मार्क्समध्ये खूप आनंदी होतो.
माझ्यासोबत जे नव्हते त्यांना जास्त असतील हे मी समजून गेलो.
परंतु काही काळानंतर तू पहिला आला आहेस ,शाळेतून समजल आहे हे कळल. मला हि चेष्टाच वाटली. परंतु खात्री केली. मला तर विश्वासच बसत नव्हता.आनंद ओसांडून वाहत होता.
आतापर्यंत सहावा सातवा येणारा मी डायरेक्ट पहिला कसा हा प्रश्न मलाही पडला होता. जरा वेगळ वाटत होत. आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतु हे सगळ खर होत.

परंतु आज एक गोष्ठ सांगतो या गोष्टीमुळे जे इतर नेहमी हुशार आणि  नंबरमध्ये येणारे मात्र खूप नाखूष होते. त्यांच्या मनात एकच गोष्ट असावी कि सगळ ठीक आहे परंतु हा मुलगा डायरेक्ट पुढे जाने कस शक्य आहे आणि ते त्यांच्या मनाला पटण्याजोगे नव्ह्ते.
प्रत्येक जन मला मनातून शिव्या घालत होता हे मी आजही जाणतो. अनेक जन अक्षर: नंबर गेला म्हणून रडले देखील ..... स्वाभाविक आहे त्यांचे रडणे देखील. परंतु माझा आनंद मात्र वेगळाच होता. कधीही न व्यक्त करण्याजोगा. 

दुपारी शाळेत बोलवलं माझा सर्व मुलांपुढे सत्कार झाला, त्यावेळी सरांनी बोलेलेल एक वाक्य कि आम्ही नेहमी शेजारील गावातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देत असतो थोडस मिश्कील होऊन होत पण ते आठवतंय अजूनही.
संध्याकाळी वडील माझा निकाल आणण्यासाठी शाळेत आले त्यावेळी एका शिक्षकांनी नकळत एक वाक्य बोलले ते माझ्या अजूनही स्मरणात आहे कि “शुद्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी “ आणि यापेक्षा दुसरी शाबासकी आपल्या पालकांना काय असू शकते . किंवा काय पाहिजे.
प्रत्येकाच्या घरच्यांसाठी यश काय असते तर पहिला नंबर येणे यापलीकडे तरी नसेल असे मी मानतो. आणि माझ्या घरच्यांच्या बाबतीत तर इतके  चांगले मार्क्स पडले हेच खूप मोठ होत. आणि त्यामुळे त्यांचा आनंददेखील खूप होता.


त्या आठवणी रम्य होत्या.  मी आवर्जून त्या नंबर न येणाऱ्या माझ्या मित्र – मैत्रीणीना सांगतो कि, तुम्ही हुशार होताच, मी तुम्हाला माझ्यापेक्षा सरसच मानतो तुमची हुशारीही मी नाकारली नव्हती आणि अजूनही नाही, माझ्यामुळे तुम्हा सर्वांना झालेला मानसिक ताण याचीही मी कल्पना करू शकतो आणि मोठ्या मनाने  त्याबद्दल माफीही मागतो.
परंतु एक गोष्ठ आवर्जून सांगतो कि मी कुठल्याही फळाची अपेक्षा न करून प्रामाणिकपणे  कर्म केले होते आणि त्याचे फळ नशिबाने आणि विधात्याने मला दिले असावे.
तुम्ही हुशारीत पुढे होताच परंतु थोडस नशिबात मागे पडला असावा अस मला वाटत.
असो ....
ते दहावीचे वर्ष .....ती दहावीची परीक्षा ..... आणि तो दहावीचा निकाल खरच माझ्यासाठी एक आत्मविश्वास वाढवणारा टर्निंग पॉंइंट ठरला असावा असे मी मानतो.

त्या वर्षामुळ ,त्या निकालामुळ मी माझ्याच मनात असलेल्या न्यूनगंडला कदाचित बाहेर काढल असाव. मला सायन्सहि पेलवल कि नाही अशी शंका होती परंतु त्याच त्या क्षणाने प्रवाहात आत्मविश्वासाने वाहत राहिलो आणि आधी डिप्लोमा मग B.E. डिग्री आणि आता सर्व काही मॅनेज करून, पार्ट टाइम अभ्यास करून फायनल  M.E. मास्टर डिग्री त्याच जोरावर मनोबल उंच करून पेलावत आहे.  आणि यात त्या दहावीच्या वर्षाची भूमिका  आणि तेव्हा मिळालेला विश्वास प्रेरणादायी ठरत आहे किंवा महत्वाची भूमिका बजावत आहे असे मी तरी मानतो. 
ते दिवस पुन्हा यायला हवे असे मला नेहमी वाटते, ते कधी न बोललेले मूल आणि मुली तरी आज त्यांच्यात असलेली आपुलकी , ते क्रिकेट खेळण,पोहणे आणि मग त्यावरून खाल्लेला सरांचा मार, सायकलवरून फिरणे ,दुसर्याला डबलशीट घेऊन जाण्यातला आनंद, एकट्यानेच कोणालाही न देता खाल्लेल्या गोळ्या, फोन आणि तसा प्रकारच्या डिजिटल गोष्टींचा दूरदूर पण सबंध नसताना घेतलेला जीवनाचा आनंद किंवा ती भूतकाळात केलेली मजा आज हवीहवीशी वाटते.


खरतर तेव्हाच यशच प्रत्येकाच्या बाततीत सगळ असते अशीही गोष्ट नाही. प्रत्येकाचे मार्ग ठरलेले असतात. तेव्हा मार्क्सनी यशस्वी झालेला जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होईलच असेही नाही किंवा तेव्हा मार्क्सच्या लढाईत हरलेला आता जीवनाच्या लढाईत हरेल असेही नाही.

फक्त प्रत्येकाच्या आयुष्यातील ते काही आठवणीचे रम्य दिवस असतात जे कि आपल्याला सुख,दु:ख,आनंद,प्रेम,प्रेरणा,आपुलकी,जिव्हाळा............., सगळ काही देऊन जातात.
आणि माझ्याप्रमाणेच प्रत्येकजनच ते दिवस आठवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आहे आणि प्रत्येकाने तो करावा देखील असे माझे मत आहे कारण त्या भूतकाळाच्या गोष्टीत रमून खरे आनंदअश्रू आणि दुख:श्रू नक्की काय आहे....? याची खरी जाणीवहि  तेव्हाच होते.

शेवटी एका निवांत ठिकाणी बसून गालावर ओंगळवाणे अश्रू घरंगळत मीही आठवतोय ते सगळ....ते मित्र......,ते दिवस.....,ते क्षण................रम्य...................आठवणी................! 

✍गणेश सातकर.