Pages

मंगळवार, ८ मार्च, २०१६

महिला बचत गट व पाणलोट उपचारांमुळे सावरलेल्या गावाची कहाणी...!

एक विकसनशील गाव म्हणून संगमनेर तालुक्‍यातील माझे गाव म्हसवंडीची आज ओळख आहे. एके काळी छान असलेले जंगल लुटलं आणि गावाला पाण्यासाठी वणवण करावी लागली. पण पाणलोट उपचारांमुळे हे चित्र बदललं आहे. गाव विकासासाठी कास धरून पुढे जात आहे.
म्हसवंडी 
तीनशे उंबरठा असणारं सह्याद्रीच्या कुशीतलं म्हसवंडी हे छोटंसं गाव. पर्जन्यछायेतल्या या गावात तीन-चारशे मिलिमीटर पाऊस पडायचा. एवढ्याशा पावसातही गावाला जंगलाचा चांगला वारसा मिळाला होता. साधारणतः पन्नास-साठ वर्षांपूर्वी कोळसा व्यापाऱ्यांची नजर या जंगलाकडे पडली. गावकऱ्यांना पैशाचं आमिष दाखवून जंगलाचा कोळसा बनू लागला, पण ही चांदी थोड्या दिवसांचीच ठरली. जंगल संपल्यावर हे व्यापारी आणि तो पैसा उडून गेला. महिला पाण्याकरता वणवण हिंडू लागल्या. "इंडो-जर्मन पाणलोट विकास कार्यक्रम' व "वॉटर' या स्वयंसेवी संस्थेचे जनक फादर हर्मन बाकर यांनी 1994 मध्ये म्हसवंडीला भेट दिली. गावच्या दुर्दशेवर "पाणलोट उपचार' हा एकमेव उपाय असल्याचं त्यांनी गावकऱ्यांच्या गळी उतरवलं. फादर बाकर यांच्या विनंतीला मान देऊन संगमनेर सहकारी साखर कारखान्याने (आत्ताचा सहकारमहर्षि भाऊसाहेब थोरात सहकारी साखर करखान्याने ) मदतीचा हात पुढे केला. "नाबार्ड' वॉटर यांनी गाव पाणलोट समितीला अंमलबजावणीत मार्गदर्शन करायचं मान्य केलं.

गावकऱ्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणं हे सर्वांत मोठं आव्हानात्मक काम होतं. फादर बाकर आणि साखर कारखान्याला गावकऱ्यांचं मन वळवायला बरीच मेहनत घ्यावी लागली. कामाच्या शोधात, जगण्यासाठी मुंबईला गेलेल्या गावकऱ्यांना गावच्या विकासाची थोडीफार दृष्टी आली होती. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. अनेक जाणकार महिलांनी कार्यक्रमाच्या जागृतीकरता अनेक प्रकारे प्रयत्न केले. त्यांना गावातील समाजकार्यासाठी झटणाऱ्या मंडळींची बहुमोलाची साथ मिळाली. अनेक व्यक्तींनी हे काम माझेच असे स्वीकारून म्हसवंडीच्या उद्धारात स्वतःला झोकून दिलं. चराईबंदीला सुरवातीला खूप विरोध झाला. कारण त्या काळी पशुपालन हा बऱ्याच जणांच्या चरितार्थाचा एकमेव व्यवसाय होता. पण हळूहळू त्यांच्या गळी ही गोष्ट उतरली. तीच गोष्ट कुऱ्हाडबंदीची. "वॉटर' संस्थेच्या संचालक डॉ. मार्सेला डिसोझा यांच्याशी या संदर्भात झालेल्या भेटीचा प्रसंग अजूनही गावकरी महिलांच्या लक्षात आहे. कुऱ्हाडबंदीची अट मागे घ्यावी याकरता डोळ्यांत पाणी आणून महिलांनी मनीषा मॅडमना (गावकऱ्यांनी मार्सेलाचं केलेलं नामांतर) विनवलं. पण गावाच्या भल्याकरता त्यांना कठोर निर्णय घेणं भाग होतं. त्यांनी कुऱ्हाडबंदी काही मागे घेतली नाही.
पुढचा वसा होता बचतीचा. सुरवातीला 1996 मध्ये 20 रुपये मासिक बचतीचा "श्रमसाफल्य' हा पहिला बचत गट सुरू झाला. लवकरच गटांची संख्या वाढत वाढत आज ती 38 वर गेली. 2000 मध्ये या सर्व गटांची मळादेवी महिला विकास समिती नावाची शिखर संस्था अस्तित्वात आली. एव्हाना गावच्या महिला फार दूरचा विचार करू लागल्या होत्या. त्यांना आयुर्विम्याचं महत्त्व पटलं होतं. आज गावच्या सर्व महिलांचा विमा उतरवण्यात आला आहे. सर्व महिला विमा पॉलिसीधारक असणारं म्हसवंडी हे संगमनेर तालुक्‍यातील नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातील पहिलंच गाव. आयुर्विमा महामंडळाने त्याच्या या कामाची दखल घेऊन त्यांना 25 हजार रुपयांचा पुरस्कर दिला तर इंडियन ओवरसीज बॅंकेने "महिला बिमा ग्राम' म्हणून आणखी 25 हजार रुपयांचा पुरस्कार दिला.
कुऱ्हाडबंदीमुळे जाळण्यासाठी लाकडे नसणार हा विचार करून महिला समितीच्या माध्यमातून सर्व गावामध्ये अल्प दरात गॅस कनेक्शन जोडनि करून दिली आणि महिला समितीचा एक स्वतंत्र गॅस विभाग तयार झाला.
हळूहळू पाण्याचे प्रमाण वाढू लागल्याने गावात सर्वच नगदी पिके घेऊ लागली त्यात कांदा हे प्रमुख पिक.
त्यासाठी लागणारी सर्वच व्यवस्था बी-बियाणे, खते ,बारदान हे सर्वच अल्प दरात चालू केले.
पुढे कांडप मशीन व्यवसाय, शेवई मशीन व्यवसाय असे लघु उद्योग विभाग वाढत गेले.
महिलांनी स्वताच्या पैशातून त्यांच्या कारभारासाठी एक प्रशस्थ इमारत उभी केली आणि तिला नाव दिले ‘महिला श्रमदानवास्तू’.
फादर बाकर यांच्या विकास सूत्रीतलं सर्वांत महत्त्वाचं सूत्र होतं. पाणलोट उपचाराचं उजाड वन क्षेत्रातील 171 हेक्‍टर जागेवर वृक्ष लागवड करण्यात आली तर जवळपास 100 हेक्‍टर जागेवर गवती कुरणं व काही प्रमाणात झाडं लावली गेली. 367 हेक्‍टर क्षेत्रावर शेती बांध, समपातळी चर घालून वाहून जाणाऱ्या माती-पाण्याला अटकाव करण्यात आला. गावातून जाणाऱ्या नाल्यावर नाला बांध, जाळीचे बांध आणि चेक डॅम घालण्यात आले. पळणारं पाणी तांबू लागलं, थांबलेलं पाणी जिरू लागलं. विहिरींची संख्या दुप्पट झाली, आटलेल्या विहिरांना नव्याने पाझर फुटले. वीस वर्षांत शेतीखालील क्षेत्र पाच पटींनी वाढलं. जेथे जेमतेम तीन महिने शेतीची कामं चालत; तेथे आज वर्षभर हात कामात गुंतलेले असतात.






मळादेवी महिला विकास समिती,म्हसवंडी  
गेली पंधरा वर्षं राबवला जाणारा आणखी एक नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम म्हणजे दिवाळी भेट. प्रत्येक घरी- मग ते कितीही गरीब कुटुंब असो- दिवाळी साजरी व्हावी, या हेतूने पैशाच्या स्वरूपात भेट न देता दिवाळीच्या फराळाला आवश्‍यक सगळी सामग्री पुरवली जाते. यासाठी दरवर्षी बदलते नियोजन असते ( यावर्षी साखर २० किलो, डाळ ५ किलो,तेल ५ लिटर, रवा १ किलो, खोबरे १ किलो, मैदा १ किलो, केसांचे तेल १०० मिली, साबण १, कपड्याचा साबण १, वेलची पुडी १, जायफळ पुडी १ व नेलकटर १) असे एकूण ३८ गटातील ७१० महिलांना दिवाळी भेटीच्या रुपात वाटप करण्यात येते.





पाणलोटाच्या माध्यमातून केलेल्या कामाचा वसा आजही म्हसवंडीतील पुढील तरुण पिढी चालवत आहे.
वृक्षांनी व हिरव्यागार वनराईने संपन्न असलेल्या गावात आजही तेथील तरुण स्वखर्चाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन यांसारखे उपक्रम राबवत आहे. हेच म्हसवंडीचे काम पाहण्यासाठी जगभरातून लोक येत आहेत आणि यातच म्हसवंडीच्या प्रत्येक नागरिकाचे समाधान आहे.
महिला बचत गट व पाणलोट उपचाराच्या कामाने गावात फक्त समृद्धीच आणली असं नाही, तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महिलांमध्ये एकजूट झाली आहे, एक नवा आत्मविश्‍वास जागा झाला आहे, त्यांच्यात नेतृत्व विकास पावत आहे. विकास आणि पर्यावरणरक्षण हातात हात घालून कसे पुढे जाऊ शकतात, याचा हा एक वस्तुपाठच म्हणता येईल.......!


नयनरम्य मळादेवी मंदिर, म्हसवंडी