Pages

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

आठवणी बाबांच्या.....!

ज्यांच्या अंगाखांद्यावर बसून,खेळून लहानाचे मोठे झालो, ज्यांनी माझ्या प्रत्येक पावलोपावली सावलीसारखे माझ्यावर संस्कार केले, ज्यांच्या कर्तुत्वाची प्रेरणा घेऊन आजपर्यंत न अडखळता चालत राहिलो आणि ज्यांच्या मायेच्या छायेत मी घडलो ते म्हणजे माझे आजोबा (बाबा) वै.ह.भ.प. सबाजी बबन सातकर.
आज त्यांच्याबद्दल बोलतोय कारण काही दिवसांपूर्वी त्यांची अचानक एक्झिट इतरांप्रमाणे माझ्या मनाला खूप चटका लाऊन गेली.

माझ्यावर अमाप प्रेम करणाऱ्या माझ्या आणि बाबांच्या अनेक आठवणी आज मनातून बाहेर येत आहेत.
कुटुंबापेक्षाहि समाजाहित आणि समाजावर प्रेम करण्याची वृत्ती त्यांची होती. आणि तेच संस्कार आमच्या संपूर्ण कुटुंबावर आणि माझ्यावर त्यांनी केले.
लहानपणापासूनच त्यांचे माझ्यावर खूप प्रेम. त्यांच्याच हाताला पकडून बालवाडीत जायचो . ते जितक्यावेळ असेतील तितकाच वेळ मी तिथे थांबायचो आणि पुन्हा ते निघताच परत यायचो.
बाबा कुठे बाजारला जात असतील तर त्यांच्या मागे सायकलवर बसून ते आवर्जून मला नेत असत. झेंडूची फुले विकायला जाताना किंवा मला डॉक्टर कडे घेऊन जाताना पुढे सायकलच्या नळीवरबसून जाण्याची गम्मत काही औरच होती. आणि त्यातूनच त्यांनी कॅरेजला धरून मला शिकवलेली सायकल आजही माझ्या स्मरणात आहे.
कुळवावर बसून त्यांच्यासोबत शेतीच्या कामाची माहिती घेता घेता शेतीची नांगर धरण्यापासून, ते पेरणीच्या वेळी शेवटच्या दोन पाभारीदेऊन  सगळी कामे अतिशय सफाईदारपने आणि अतिशय गोडी लाऊन त्यांनी शिकवलेल्या अनेक गोष्ठी आजही आठवतात. मला ते आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचे.

त्यांचे कर्तुत्वच खूप काही मला सांगून जात होते. आधात्म आणि समाज हे त्यांचे पहिलं प्रेम. समाजाच्या प्रत्येक कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा मग गावातील अखंड हरीनाम सप्ताह असो किंवा अन्य इतर गावातील कार्यक्रम असो.
आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी वारकरी साम्प्रदायचा प्रचार आणि प्रसारासाठी खर्च केला. पंचक्रोशीत काकडा अभंगचा महारथी म्हणूनच त्यांची ओळख होती.
याच त्यांच्या कार्याची दखल थेट महाराष्ट्र शासनाणे देखील घेतली आणि त्यांचा सन्मान करून अध्यात्म क्षेत्रात भरीव कार्याबद्दल संपूर्ण पठारभागात शंकर महाराजांनंतर ते एकमेव व्यक्ती होते कि ज्यांना पेन्शनरुपी मानधन चालू केले गेले होते.

गावातील पंढरपूर वारी असो, त्रंबकेश्वर वारी असो वा आळंदी वारी असो त्यांचा या नियोजनात नेहमीच पुढाकार असायचा. त्यांच्या नेतृत्वाखाली या वारी संपन्न करायचे. एव्हढेच नाही तर आज म्हसवंडीच्या प्रत्येक वारकर्याची  पंढरपूरमध्ये गैरसोय होऊ नये म्हणून गावची तिथे एक नवीन प्रशस्त खोली घेण्यात बाबांचा मोलाचा वाटा होता. गव्हाळा डोंगराचा रस्ता जवळपास पंच्याहत्तर टक्के रक्कम खर्च करून त्यांनी करून घेण्यात मोठा वाटा आहे.

आताही चालू असलेल्या कार्तिक स्नान काकड्याचे रंग रूप बदलून अनेकांना याची गोडी लागेल असे आकर्षक करण्यात त्यांचे मोठे योगदान . त्यांची एक्झिटहि कशी व्हावी तर नेहमीप्रमाणे काकड्याला निघत असताना थोडस अस्वस्थ जाणवले थोडसं जाळाची उब घेतली आणि उब घेता घेताच पांडुरंगाच बोलावण आल.

मला नेहमीच ते अध्यात्माची शिकवत देत राहिले. आळंदी पंढरपूर याची देही याची डोळा पाहण्यासाठी खास गर्दी नसताना परंतु कार्तिकी यात्रेला ते मला नेत असत. आपला नातू बुवा व्हावा हे त्यांची खूप मोठी अपेक्षा होती. चौथी नंतर त्याचप्रमाणे  सातवीनंतर त्यांचा नेहमी वारकरी शिक्षण संस्थेत मला दाखल करण्याचा हट्टहास असायचा. परंतु त्यांचे दुर्दैव आणि माझेची दुर्दैव वा सुदैव मला कुठल्याना कुठल्या कारणास्तव तिथे जाण्याचे टळत राहिले.

माझे त्यांना खूप कौतुक असायचे संपूर्ण गावात माझ्या कौतुकाचा पाढा असायचा कुठलीही छोटी किंवा मोठी गोष्ठ मी केली तर अभिमानाने सर्वांना सांगायचे.

घरी कोणताही पाहुणा आला कि काही वेळातच समोरच अडकवलेले माझे मेडल दाखवून माझे कौतुक सांगायचे ‘ आमचे पॉर लय हुशार आहे दहावीला त्याचा शाळेत पहिला नंबर आला, गवोरमेंट कडून त्याचा नंबर लागला डीक्लोमाला मीच अडमिशन घेऊन दिले कालेजमध्ये लय बक्षीस मिळवली त्याने.
माझ्या प्रत्येक निकालाचा उल्लेख ते गावातील अनेक लोकांना सांगून माझे कौतुक करून करायचे.
जेव्हा डिग्रीमध्ये चांगले मार्क्स घेऊन पास झालो तर बाबा संर्वांना सांगायचा कि आमच पोर इंजीनिअर झालं. पुढे कामाला लागलो तर बाबांनी सगळ्यांना माझ्याबद्दल सांगायचा. काही दिवसांनतर तर मी पुढचे शिक्षण घेतो आहे हे सांगितल्यावर तर सगळ्यांना बाबा सांगायचा कि आमच पॉर डबल ग्रजुएट होत आहे. लय हुशार आहे. जितके कौतुक करायचा तितकेच प्रेमदेखील. कधी घरी यायचो असेल तर प्रत्येक तासाला बाबा घरच्यांना मला फोन करण्यासाठी सांगत असे.

अनेकांचे लग्न जमवण्याचा बाबांचा खूप मोठा हातखंडा होता. अनेक लग्न त्यांनी जमवून दिली परंतु अनेक ठिकाणी बोलून दाखवलेली इतर पारंपारिक रूढी परंपरेचा पगडा असणार्या व्यक्तींप्रमाणे थाटामाटात नातवाचे लग्नाची त्यांची इच्छा मात्र त्यांची अपूर्ण राहिली.

म्हसवंडीतील वारकरी सांप्रदायाची भिंत बाबांच्या रूपाने कोसळली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही आणि ती काधिहि न उभी राहण्याजोगी आहे. आमच्या सातकर कुटुंबाचा तर पायाच कोसळला आहे. आज एकमेव असणार्या सातकर परिवाराचा म्हसवंडीच्या विकासात जो काही बहुमोलाचा असा खारीचा वाटा आहे किंवा पंचक्रोशीत जे काही मानाचे स्थान आहे त्याचे संपूर्ण श्रेय हे बाबांना आहे.
 
   माझ्या जीवनघडणीत तर बाबांचा खूप मोठा वाटा आहे. आज बाबा जरी नसले तरी जेव्हा जेव्हा त्यांची मला आठवण येईल तेव्हा अश्रुंबरोबर त्यांचे जीवन नेहमीच मला प्रेरणा देईल यात काही शंका नाही.

दोन ओळी बाबांसाठी......  

तुम्ही होता जेव्हा इथे ...तेव्हा नव्हते काही उणे,
आता गेलात दूरदेशी... मन हे झाले उदासवाणे.

नयनी पूर आसवांचा... खरी संपली सावली,
तुमच्या कर्तुत्व कलेचा... येतो आठव पाऊली.

कसा नियतीचा खेळ... केले पोरके आम्हाला,
आम्ही तुमची लेकरे... कसे विसरू तुम्हाला.

शब्दसुमने चरणी ... दाटलेल्या कंठातूनी,
वाहतो हि श्रद्धांजली... आम्ही विनम्र होऊनी.

परमेश्वरा तुजला रे... करतो एकच विनंती,
आमच्या सद्गुणी बाबांना... प्राप्त होऊ दे सदगती........!

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

वाढदिवस पार्ट्या.....!

Anyone don’t take personally

प्रिय..........,

सकाळी मित्राने उपलोड केलेले फोटो सहज पहिले, मीही होतो त्या फोटोंमध्ये. परंतु थोडे त्यावर आधारित एक दुसरी बाजू जाणवली आणि त्यात मला अपघातानंतरच्या अनुभवानंतर प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू लगेच डोळ्यासमोर यायला सुरुवात होत आहे.    

एकीकडे ग्रामीण भागात जुन्या संस्कृतीचे जतन होत असताना दुसरीकडे शहरी भागात पाश्चात्य संस्कृतीचे झटपट अनुकरण होताना दिसत आहे.

त्यात नवीन आलेले फेड वाढदिवसाच्या पार्ट्यांचे.... अहोरात्र कष्ट करून ग्रामीण भागतील आईवडील मुलाला शिकण्यासाठी शहरात पाठवतात. परंतु तिथे गेल्यावर त्याला शहरी पाणी लागते आणि त्याचे रूपच बदलते गुणांखेरीज.

चार चौघ उनाड  मित्र मैत्रिणींना घेऊन पार्ट्या करायच्या आणि तेही मोठ्या महागड्या हॉटेलमध्ये जाऊन ,ज्यात म्हणायला गेले तर एक महिन्याची एका मुलाची खानावळीचे पैसे क्षणार्थात चकनाचूर होतात आणि त्यात output काय शून्य फक्त मजा.

हि मजा करणे अयोग्य असे माझे म्हणणे नाही परंतु हि गोष्ठ प्रत्येकाला करावी लागते त्याची ऐपत असेल नसेल तरी..

बड्या बापाच्या पोरांचे ठीक आहे परंतु माझ्या तुम्हासारख्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे काय तेही करतातच.
जे पैसे आपल्या आईबापांना कमवायला एक महिना लागतो तितकी रक्कम आपण एका वेळेत कुठलाही मागचा पुढचा विचार न करता खर्च करतो.

पण याची किंमत तेव्हा कळते जेव्हा आपण दोन पैसे कमवायला लागतो.
जेव्हा मीही दोन पैसे कमवायला लागलो तर जाणवले शौक तो मां-बाप के पैसो से पुरे होते है ,अपने पैसो से तो सिर्फ जरुरते पुरी होती है.

मी तर असे म्हणेल कि जरुरते पण नाही पुरी होत. जेव्हा तोच पैसा आपण कमवतो तेव्हा तो इतका काटकसरीने व जबाबदारीने वापरतो कारण त्या पैशाची किंमत आपल्याला कळलेली असते. आठ-नऊ तास सावलीत बसून पुढे म्हणेल कि a.c. मध्ये बसून मिळालेल्या फुटकीभर कवडी मोलाचे आपण किती जपून वापर करतो तोच विचार आपण आपल्या घरच्यांच्या बाबतीत का करत नाही.

   माझ्या बाबतीतली एक गोष्ठ नक्की सांगेल माझ्या पार्ट्यांमध्ये जेवणारी सगळेच माझ्या संकट समयी चार पाच दिवस अहोरात्र माझ्या बरोबर माझ्या पाठीशी होते परंतु त्याला पार्ट्यांची परतफेड म्हणता येणार नाही तर आपले मित्रांवरती आणि त्यांचे आपल्या स्वभावावर आपल्यावर  असलेल्या प्रेमामुळे. त्यामुळे पैसा खर्च केला तरच व्यक्ती जवळ येतात हा घोड गैसमज आहे. आणि असा करून कुणी घेऊही नये.

जेव्हा एकाद्या मित्राची परिस्थिती नसेल तेव्हा का इतर त्याला बोलत नाही कि तू एक चहा जरी पाजला तरी ती आम्हाला पार्टीसारखाच आहे आणि तो स्वताही का असे सांगू शकत नाही हे मला अजुनहि कळले नाही.

आई बापाचा किंवा तुम्हा स्वताचा भरपूर पैसा विधायक नाही तर विदारक कामासाठी खर्च करायचा आणि वरून बडेजाव पना दाखायचा हे काय उपयोगाच. जेव्हा तुमच्याकडे असेल तेव्हा गोष्ठ वेगळी आहे.

मीही धुतल्या तांदळासारखा आहे असे मी म्हणणारच नाही कारण मीही अनेक अश्या बर्थडे पार्ट्यांमध्ये हेड ऑफ द टेबल बसलो आहे. परंतु तेव्हाही थोडं चुकीच वाटत होत पण थोडंसच परंतु तो एक काळ असतो आणि त्यात आपण वाहवत जातो. ह्या गोष्ठी करायला नाही पाहिजे असे माझे म्हणणेच नाही आहे परंतु व्यक्तीनुसार त्याचे स्वरूप चेंग झाले पाहिजे असे माझे म्हणणे.

असो शेवटी ओ भी एक दौर था ये भी एक दौर है किती दिवस त्या स्थिर स्थावर असलेल्या संकृतीच्या जाळ्यात अडकून पडायचे. त्यातून बाहेर येऊन स्वचंद भरारी घ्यायची आहेच परंतु आपला आपणंच विचार करून कि आपण कोण आहोत आपण कुठून आलो आहोत, आपल्याला कोठे जायचे आहे आणि आपण काय करत आहोत.

 What do you want …Finally choice is yours………………!

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

बैल पोळा काही आठवणी ...!!

बैल पोळा......काही आठवणी .......!!!

शेतकऱ्यांची जान असलेल्या सर्व माझ्या बांधवांना श्रावणी बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेछा.

बळीराज्याला वर्षभर जिवभावाच सोबती कोन असेल तर ती आपली बैल जोडी. ह्या बैलराज्याप्रती प्रेम व्यक्त करन्याचा हा दिवस.

शेतकऱ्याचा बैल आणि गरीबाची बायको आजारी पडू नये’ अशी एक ग्रामीण म्हण आहे. यावरूनच शेतकऱ्यासाठी बैल किती महत्वाचा व अनिवार्य आहे हे समजून येते. बैलाचे शेतकऱ्यावर खूप उपकार असतात व हे तो आयुष्यभर फेडू शकत नाही म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा अत्यंत आत्मीयतेने साजरा केला जातो.



म्हसवंडीचा ( माझ्या गावचा ) बैल पोळा......!

सह्याद्रीच्या कुशीत, दोन जिल्हे आणि तीन तालुके यांच्या सरहद्दीवर, डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले जेमतेम दोन अडीच हजार लोकसंख्या असलेले माझे छोटेसे म्हसवंडी हे गाव.

गावचा मुख्य व्ययसाय हा शेती त्यामुळे आमच्या गावच्या बैलपोळ्याला देखील वेगळाच महत्व आहे. गाव थोड पारंपारिक व अध्यात्मिक असल्यामुळे पोळ्याच्या दिवशी पाउस पडतोच अशी आख्यायीका आहे.

हि गोष्ठ वैज्ञानिकदृष्ट्या कशीही असली तरी गावच्या लोकांचे समाधान यात होते कि आतापर्यंत पाऊस आला नाही पोळ्याला नक्की येणार हा एक भाभडा विश्वास निर्माण होतोय आणि हि गोष्ट शेतकऱ्यांसाठी खूप दिलासादायक असते. परंतु यावर्षी आतापर्यंत भरपूर पाऊस पडला आहे तरीही मी प्रार्थना करतो की आज देखील जोरदार पाउस पडेल.


यात्रा, दिवाळी येवढेच महत्व आमच्या इथे बैलपोळ्याला आहे. सर्व मुंबईकरपुणेकर किंवा जे कोणी नोकरीधंद्याच्या निमित्ताने बाहेर असतात आवर्जुन ह्या सणाला गावी जातात. अगदी शेवटच्या वर्षापर्यंत मीही पोळ्याला आवर्जून जायचो पण आज जाता आले नाही.


पण मला काहीच वर्षांपूर्वीचे दिवस आठवतात...........,

बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी ओढ्यावर बैल न्यायचे.
चांगले घासून पुसून धुवायचे.

चिखलात माखलेले आजोबा व मी आणि चमकणारे बैल. वडील गावच्या नाटकाच्या तयारीत मग्न असल्यामुळे हि कामे आजोबा आणि मलाच करावी लागत असे.

धुताना बैलांशी चाललेल्या गप्पा.  त्याच्या मानेला घासताना त्यानेही आपल्या मानेला घासून दिलेली पसंती.
त्याला लाड कसे करून घ्यायचे चांगलंच समजायचं. पोळ्याच्या दिवशी दुपारपासून बेगडबाशिंग,  झालरी,  रिबिनीफुगे, रंग घेऊन बैल सजवायचे.

शिंगाला पितळी टोपत्याला गुलाबी लोकरीचे गोंडे,
हिरव्यालाल रंगानी बैलाच्या पाठीवर त्यांची नाव रंगवायची.

असला सगळा जामानिमा करून बैल व घरून केलेला पुरण पोळीचा नैवद्य घेवून डोंगरावर असलेले आमचे ग्रामदैवत मळादेवी मातेच्या मंदिराला वाजत गाजत प्रदिक्षिणा घालून बैल पुन्हा गावात मारुतीच्या मंदिरासमोर मिरवणुकीसाठी आणायचो.

bail pola photo ganesh satkar mhaswandi
    २००३ सालच्या पोळ्याची आठवण ...(मळादेवी मंदिराजवळ) 

दिवस मावळतीला गेलेला असायचा.

त्यालाही पोळा फुटायची वाट असायची म्हणून उगाच रेंगाळत बसायचा.

डफडसंबळ  आणि ताशाच्या तालावर बैल झुलायचे. मग आम्हीही खूप नाचायचो. पारावर मांडीवर मांडी  टाकून बसलेले आजोबा आणि ज्येष्ठ मंडळी आमचं नाचणे पहायचे  आणि त्यापेक्षाही गावात बाहेरून आलेल्या नवीन मुली त्यामुळे आम्ही आणखीच नाचायचो आणि संध्याकाळी घरी येऊन पोटफुटत पर्यंत पुरणपोळी, गुळवणीसार – भात खायचो.


हे सर्व काही असले तरी सर्वजन आतुरतेने वाट बघत असायचे ते एका गोष्टीची......

पुर्वी पोळ्याच खास आकर्षन होते ते म्हणजे गावातील कलाकारान्नी सादर केलेले रात्रीचे नाटक.

माझ्या वडिलांना नाटकाची आवड असल्यामुळे आणि ते स्वतः लेखक असल्यामुळे त्यांचा यात संपूर्ण सहभाग.

१९८६ साली वडिलांनी लिहिलेल्या 'देवा तुझा न्याय कसानाटकाचा पहिला प्रयोग देखील गावात झाला होता.

नंतर गावातील कलाकारांनी विविध प्रकारची ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिकअनेक नामवंत लेखकांची नाटके पोळ्याच्या निमित्ताने सादर केली आणि ते पाहण्याची मज्जाच वेगळी होती.

कारण बाहेरून बोलावलेल्या तमाशा किंवा और्केष्ट्र पेक्षा गावातील कलाकारांनी आपापली शेतीच्या कामातून वेळ काढून संपूर्ण एक ते दीड महिना रीअसल करून सादर केलेले नाटक बघण्याची मज्जाच काही औरच.


आज गावात काही कारणास्तव नाटक नाही तरी देखील हा सन उत्साहात साजरा होइल.


आज ते सर्व मिस करतो आहे.........!


आणि आता अशीही परिस्थिती झाली आहे कि,

ओढ्याला पाणी आहे पण दावणीला जनावर नाही.

पोळा येणार आणि जाणार.
मातीचे बैल आणायचे अन पूजा करून घास घशाखाली ढकलायचे.

पुरणाचा घास आजकाल कडू लागाय लागलाय किंवा तशी सुरुवात झाली आहे....!


---------------------------

मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

मी... एक अपघात... आणि काही दिवस.....!


         तो क्षण आठवला कि अजूनही संपूर्ण डोळ्यासमोर अंधारी निर्माण होते, हात – पायांचा थरकाप होतो, छातीची धडधड अचानक वाढते आणि मन सुन्न होऊन शरीर स्वस्थ पडते. कारण जो प्रसंग त्यादिवशी घडला त्याने संपूर्ण जीवनाकडे पाहण्याची वृत्ती बदलून टाकली........!

मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा होता. तसेही मला कामाला चार दिवस सुट्ट्या होत्या, कारण सर्वात जास्त जोडून आलेल्या सुट्ट्यांपैकीच त्या होत्या. गावाला जाऊन दोन-तीन लग्नांना जाण्याचा विचारपण होता आणि तसेच थोडा घरी आराम करवा असे वाटत होत, पण या मस्त सुट्ट्यांमध्ये एक गोष्ठ मध्ये येऊन टपकली ती म्हणजे माझ्या एम. ई. ची cPGCON हि कॉन्फेरेंस.

जीकि २५ आणि २६ या दोन दिवशी होणार होती आणि ती अटेंड करणे हे अनियार्य होते . त्यामुळे चार-पाच दिवसाच्या सुट्टीवर तर संपूर्ण पाणी फिरले होते.


आदल्या गुरुवारच्या दिवशी दुपारी २४ तारखेला मस्त मित्रांसोबत धुलीवंदन साजरी करून संध्याकाळी मित्राच्या रूमवर आम्ही स्वतःलाच रिअल हिरो समजणाऱ्या चार मित्रांनी रूमवर बिर्याणी बनवून थेट सरांनाच आमंत्रण दिले आणि सरांसोबत तीन तास गप्पा मारत एका प्रकारची स्वस्तात मस्त अशी पार्टीच केली होती. त्यामुळे रात्री मिन्त्रांबरोबर गप्पा मारता मारता झोपायला तसाही खूप उशीर झाला होता, तो दिवस खूप मजेत गेला होता .

दुसरा दिवस होता शुक्रवार, दिनांक २५ मार्च २०१६, सकाळी उठायला उशीरच झाला होता, सकाळी ९ वाजता PCCOE कॉलेजमध्ये(ज्या ठिकाणी कॉन्फरन्स होती ) जाऊन रिपोर्टिंग करणे गरजेचे होते. घाईघाईत आवरून माझ्या दररोजच्याच ८:४८ वाजताच्या लोकलने मी निघालो. सव्वा नऊ वाजता पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, आकुर्डी मध्ये मी पोहचलो. मित्रांना फोन केला रजिस्टेशन प्रोसेस कशी आहे कुठे आहे विचारून घेतले आणि कॉन्फरन्सच्या ठिकाणी पोहचलो.

अतिशय भव्य दिव्य असे आयोजन आणि नियोजन पण तसेच,उत्तम व्यवस्थापन सगळच एकदम भारी होत.
आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे जेवणाची व्यवस्था. मित्रांसोबत कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊन पहिला सेशनचे सर्व औपचारिक काम पूर्ण केले. दिवस एकदम आनंदी चालला होता.

दुपारी बारा वाजता या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ होता आणि तोही कुलगुरू वासुदेव गाडे यांच्या उपस्थितीत, त्याठिकाणी थोडा वेळ थांबलो पण तिथे काय चित्त लागेना कधी कार्यक्रम संपून भोजन करू असे झाले होते. शेवटी कसाबसा वेळ काढून कार्यक्रम संपवून जेवणाकडे आलो.

अतिशय सुंदर व्यवस्थापण तसं जेवणहि तितकंच चांगलं. जवळ दहा पक्वान भोजन व्यवस्था त्यात वेगवेगळ्या आईसक्रीमचे वेगळे कुपन्स. मस्त जेवण केले. काही क्षणात मनात कल्पना आली माझ्याकडे तर कुपन्स आहेत. त्यात भोजनासाठी फक्त आई.डी ची गरज तेही माझ्याकडे आहेत मग मित्रांना का नको बोलवायला? दुसर्याला जेवण देण्यात जो आनंद आहे तो दुसर्या कशातच असू शकत नाही.

लगेल फोन केला एका मित्राला, परंतु तो बाहेर असल्यामुळे त्याला येन शक्य नव्हते. दुसर्याला फोन केला परंतु तोही जेवला होता. मनातविचार आला नको जाऊदे...

पण न राहून परत मग निखीलला फोन केला तोही झोपला होता परंतु आग्रहखातर येतो बोलला. अर्ध्या तासाने जवळ-जवळ दोन वाजता तो आला आम्ही भेटलो ,थोडं फिरलो आणि मग थोडं जेवणही केलं.


शेवटचा सेशन अडीच वाजता सुरु होणार होता. त्यात निखीलहि बोलला माझे आपल्या कॉलेजकडे काम आहे मी ३ वाजता जातो आहे तूझे काम होत असेल तर आपण बरोबर जाऊ. माझे संपूर्ण काम तर झाले होते. फक्त जाऊन सह्या करून यायचे होते, परंतु तीच मोठी गोष्ठ होती. कुठलाही संकोच न करता मी हो बोललो. निघताना फोन कर असे म्हणून तो रूमवर गेला.


मीही मिन्त्रांसोबत कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊन सह्या करून माझे काम पूर्ण केले, तसे सेशन पूर्ण होण्याअगोदर उठून बाहेर जाने म्हणजे चुकीचे वाटत होते परंतु एका क्लासमेटचा मोबाईल फोन चोरीला गेला होता ह्याचे थोडे उदात्तीकरण करून बाहेर आलो. मोबईल सापडण्यासाठी थोडासा पुढाकार घेऊन cctv सर्वर रूम मध्ये देखील थांबलो परंतु cctvला storage नाही हे कळल्यावर कॉलेजच्या व्यव्स्थापणाला दोष देत बाहेर आलो या प्रकारामुळे थोडा उशीरच झाला होता आणि निखीलला फोन केला.

निखीलहि बोलला तू स्टेशनवर ये तोपर्यंत मीही पोहचतो. परंतु थोड्या वेळात परत त्याचा फोन आला आणि बोलला मला पोहचायला थोडा वेळ होईल आपली लोकल जाईल आपण बाईकवर जाऊयात. कदाचित हीच वादळापूर्वीची शांतता होती.


थोड्याच वेळात निखील गेटवर पोहचला गाडी होही R15 नेहमीचीच. खूप वेळा त्यावर बसून फिरलेलो. एका शोर्टकट पण माझ्यासाठी नव्या असलेल्या रस्त्याने आम्ही पुणे- मुंबई एक्प्रेस हायवेकडे निघालो त्यावर निखीलचे उद्गार निघाले ‘यु आर गोइंग टू शॉक’.

थोड्याच वेळात आम्ही नेहमीच्या रस्त्याला लागलो, सुसज्ज केलेल्या पीएमटी स्टेशन पाहत मी मागे बसलो होतो. काहीच वेळात मुकाई चौकातून ब्रिजखालून पुणे-मुंबई एक्प्रेस हायवे क्रॉस करून आम्ही ओल्ड पुणे मुंबई हायवेला लागलो.

लवकरच रूमवर जाऊन आराम करण्याचा विचार होता. गहुंजे क्रिकेट स्टेडीअम जवळ आल्यावर सहज घड्याळाकडे पहिले तर दुपारचे ३ वाजून ३५ मिनिटे झाली होती, त्यातच निखिलच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडले आपण कुठेतरी चला पिउयात, मीही बोललो ठीक आहे एखाद्या चांगल्या ठिकाणी पिऊयात. मागे मला थोडी अडचण होत असेल यामुळे निखिलने त्याची बेगहि पुढे घेतली होती.



तिथून पुढे अंदाजे दोनच मिनिटे झाली असतील म्हणजेच वेळ अंदाजे ३ वाजून ३७ मिनिटे आम्ही देहूफाटा क्रॉस करून पुढे निघालो गाडीचा स्पीडहि होता ६५ ते ७० च्या दरम्यान मागे हातात एक फाईल घेऊन मी कुठल्याही आधाराविना निवांत बसलो होतो, तो क्षण सगळ काही आता स्पष्ट आठवतय पुढून क्विड गाडी डीवायडर मधून वळत होती, आम्ही जात पर्यंत कदाचित ती संपूर्ण निघूनही गेली असती परन्तु सावधानता म्हणून निखीलने गाडीचा स्पीड कमी केला तोपर्यंत क्विड गाडी संपूर्ण क्रॉस झाली होती, आणि तेव्हढ्यात अचानक स्पीड कमी झाल्यामुळे मागून येणाऱ्या एका फोर व्हीलरने ( स्कोर्पिओ असावी असा अंदाज) जोरदार मागून गाडीला धडक दिली. चूक आमची नव्हती असेही म्हणता येणार नाही कारण एका हाताने कधीच टाळी वाजत नाही परंतु जास्त चूक नव्हती असे म्हणता येईल. मी मागे अगोदरच चार फुटावर बसलो होतो, इतक्या जोरदार धडकेने मी आणखी दोन फुट उडालो म्हणजे जवळजवळ सहा फुट हवेत उडून मी खाली पडलो. तेव्हढ्यात आमची गाडीहि जाऊन एका मोटारसायकला जाऊन ठोकली होती. माझे डोळे अचानक बंद झाले होते बेशुद्द अवस्थेत मी जवळ जवळ एक ते दीड मिनिटे मी रस्त्यावर होतो. एक मिनिटाच्या अंधारीनंतर मला शुद्ध आली हायवेच्या मधोमध मी डांबरीवर पडलो होतो पुढे मोटारसायकल वाला देखील त्याची गाडी सावरत होता सगळ्या गाड्या येऊन थांबल्या होत्या निखीलहीगाडी उचलून साईटला घेत होता आजूबाजूला जमा झालेले लोक उचला, डॉक्टरकडे घेऊन चला असे बोलत होते तर मला जाणवले डोक्याला काहीतरी लागले आहे, हात कपाळावर गेला आणि कपाळावर जवळजवळ एका टेनिस बाल पेक्षाही मोठ्या आकाराचे टेंगुळ माझ्या हाताला लागले. आणि त्यातच मी डिप्रेशनमध्ये गेलो. ओठांतून सगळ्या अंगावर रक्त पडत होते. मी खूप घाबरलो होतो. काहीतरी मोठा गुन्हाच केला आहे असे मला वाटत होते. शुद्ध आल्यानंतर माझे विचारचक्र दुपटीने गती घेऊ लागले.



एक स्कोर्पिओ वाला उठवून गाडीत बसउ लागला परंतु मला भीती होती मी केलेल्या काहीतरी वेगळ्याच गुन्ह्याची. घरचे बोलतील परंतु मी चांगल्या कामाला गेलो होतो याचा प्रूफ म्हणजे फाईल होती मी ती शोधत होतो, लोक गाडीत बसा बोलत होते, परंतु मी दूर पडलेली फाईल घेऊन आलो आणि गाडीत बसलो, खूप रक्तस्राव चालू होता ओठातील काही रक्त मी गिळूनहि घेत होतो. गाडीत बसल्यानंतर मी निखीललाही बोलावत होतो परंतु गाडीची काच काही केल्या मला उघडत नव्हती. कुठलाही वेळ न घालवता त्या गाडीवाल्या (देवमाणसानेच म्हणा) मला जवळच्या आधार हॉस्पिटलमध्ये आणले. अवघ्या पाचव्या मिनिटात मी दवाखान्यात होतो. परंतु त्या गाडीतल्या दोन मिनिटांच्या क्षणात विचारचक्र इतके फास्ट झाले होते कि निखीलच्यागाडीचे जास्त नुकसान नसेल ना झाले , आता पोलीस केस होणार त्याहीपेक्षा जीवनमरणाच्या गोष्टीचा विचार मनात येत होता आता सगळ्याच बाजूने कचाट्यात आपण सापडलो आहे असे वाटत होते.


दवाखान्यात पोहचल्यावर लगेच मला स्ट्रेचरवरून अपघात विभागात घेऊन गेले. जाता जाता माझा फोन वाजला मित्राने फोन केला होता.  मी फोन उचलून डॉक्टरकडे दिला आणि पत्ता सांगायला सांगितले. लगेच दोन तीन डॉक्टर आणि बाकीचा स्टाफ उपचाराला लागला.  दोन्ही ओठामधे दात घुसले होते हाताला थोडे खरचटले होते,
डोळ्याच्या खाली संपूर्ण गालावर जखम झाली होती.  भयानक असे डोक्याला टेंगुळ आले होते, वरचा ओठ फाटला होता, एक दातही तुटला होता. असंख्य वेदनेसह मी उपचार घेत होतो,
ओठाला सहा टाके टाकले पडले होते, दोन्ही ओठांनाच्या खाली रक्तस्राव थांबवा म्हणून मेडिकल पॅड ठेवण्यात आले. इन्जेक्षण देण्यात आले त्यामुळे वेदना काहीश्या कमी झाल्या होत्या. चेहऱ्याची उजवी बाजू पूर्ण सुजली होती.  मी पूर्णपने डिप्रेशनमध्ये चाललो होतो.


लगेच ct स्कॅन साठी मला नेण्यात आले. सर्वात महत्वाची गोष्ठ हि होती कि मी संपूर्णपणे शुद्धीवर होतो. ct स्कॅन रूम मध्ये खूप सारी थंडी वाजू लागली पण सांगणार कोणाला जवळ जवळ १५ मिनिटे स्कॅनिंग चालू होते त्यात माझी अवस्था काय झाली होती त्याचे वर्णन मी करूच शकत नाही.

आणि याचदरम्यान मित्र तिथे येऊन पोहचले. त्यांनी थोड्याच वेळात निखीललाही तिथेच आणले. माझा ब्लडप्रेशर कमी होत होता त्यानंतर डिरेक्ट आय सी यु मध्ये हलवण्यात आले. बरेच मित्र आले होते. तोपर्यंत निखीलचाही चेकअप झाला त्यालाही हाताला फ्रक्चर होते.

आय सी यु मध्ये गेल्यानंतर ऑक्सिजन मास्क लावण्यात आला. मनातून मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. कारण मला हे माहित होते मानसिक दृष्ट्या जर आपण बरे असलो तर आपण लवकर बरे होऊ शकतो. प्रत्येक नवीन डॉक्टर येऊन विचारपूस करत होता. माझ्या मनात शंका एव्हढीच होती कि मेंदूला मार लागलेला नसावा.


तोंडाला इतके लागलेले आणि हातापायाला काहीच न झालेलं यावर कोणत्याच डॉक्टरांचा विश्वास नव्हता त्यामुळे प्रत्येक डॉक्टर आल्यानंतर एकाच बोलत होता, हात वर करा पाय वर करा, चक्कर येत आहे का ? फीट चा काही प्रोब्लेम ? उलटी झाली होती का ? प्रत्येक डॉक्टर ला हे सांगून मी वैतागलो होतो. परंतु मानसिक अवस्था माझी बळकट झाली होती कारण यापैकी काही नाही मग माझा धोका टळला आहे असे मला वाटत होते. त्यातच मी डॉक्टर ला सांगत होतो माझ्या चेहर्याला काही झाले नाही पाहिजे एकदम व्यवस्थित उपचार करा.


उद्यापर्यंत मी बरा होणार अस माझ मन सांगत होत. मित्र भेटायला येत होते बाकीची सगळी जबाबदारी मित्रांनीच पार पाडली. घरी सांगू नका मी उद्यापर्यंत होईल व्यवस्थित आणि उद्या आत्याच्या मुलाचे लग्नहि आहे त्यामुळे उद्या संध्याकाळी फोन करू असे मी सांगितले. मी खूप चांगला आहे असे मला वाटत होते परंतु सगळे काही विदारक ,भयानक घडले होते. परीस्थीतीची जाणीव ओळखून मित्रांने माझ्या दाजींना फोन केला त्यांनीही बहिणीला वेगळच कारण सांगून आले त्यादरम्यान निखिलचे मामाही आले होते. मित्रांची भेटायला रांग लागली होती परंतु आय सी यु मध्ये असल्यामुळे आतमध्ये सोडत नव्हते. खर्या वेळेला धावून आलेल्या सगळ्याच मित्र-मैत्रिणीनी आपापल्या परीने जबाबदारी स्वीकारून काम करत होते.

लेझीमच्या निमित्ताने वडील मुंबईला होते घरी फोन लागणे दुर्मिळच तरीही कसेबसे दोन्हीकडे मित्रांने संपर्क साधला मला काहीही माहित नव्हते.

रात्री दहा वाजता रिपोर्ट आले. सगळ्या गोष्ठी या नॉर्मल आहेत असे डॉक्टर न्युरो सर्जनला सांगत होते, ते मी ऐकत होतो. त्यामुळे माझे मानसिक मनोबल आणखीच वाढले. भेटायला येणाऱ्या प्रत्येकजन मला पाहून गळून पडत होता. दररोज हसणारे मित्र मैत्रिणी मला पाहून सुन्न होत होते. तरीही मी त्यांना ईशार्यातून एकच सांगण्याचा प्रयत्न करत होतो कि स्माईल करा मी बरा आहे. काही वेळा तर ओक्सिजन मास्क काढून मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो कि मी पूर्ण बरा आहे.


रीपोर्ट ऐकल्यानंतर मी एका डॉक्टरला बोलावून विचारले मला खरच आय सी यु मध्ये ठेवण्याची गरज आहे का ? त्यावर डॉक्टरचे असे म्हणणे होते कि थोडेसे मेंदूला मार आहे २४ तास अंडर ओब्सरव्हषण ठेवावे लागेल. मग डॉक्टर ला पुन्हा विचारले इथे राजीव गांधी आरोग्य योजना आहे का ? त्यावर त्यांचे उत्तर आले नाही ...त्यावर आणखी एक गोष्ठ लगेच माझ्या मनात आली ती म्हणजे पैसे?


लगेच डॉक्टरला बिलाबद्दल विचारले ? त्यावर त्याचे म्हणणे होते कि तुला बरे होणे महत्वाचे कि पैसे ? माझ्याबरोबर कोणी नाही आहे मी इकते सारे पैसे भरू शकणार नाही मला गरज असेल तरच आय सी यु मध्ये ठेवा असे मी त्यांना सांगत होतो. त्यावर उद्यासकाळी चेकअप करून आपण जनरल वार्डला शिफ्ट करू असे सांगण्यात आले.


मी उद्याची वाट पाहत होतो परंतु वेळ काही केल्या जात नव्हता मी वारंवार घड्याळाकडे पाहत होतो. अर्धा तास मला एका रात्रीसारखा वाटत होता. डोक्यात नुसते विचार चालू होते. अनेक जनांचे झालेले अपघात मला आठवत होते . त्यांची परिस्थितीहि डोळ्यासमोर येऊ लागली. डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते. काहीतरी खूपच मोठा गुन्हा मी केला आहे असे मला वाटत होते. विधात्याला पण मीच सापडलो होतो. सर्वजन माझ्यासाठी लवकर बरे हो असे प्रार्थना करत होते तर मी इकडे मलाच कोसत होतो.


रात्रीचे सव्वादोन वाजले होते. मला तर झोप येतच नव्हती, अचानक आय .सी यु चा दरवाजा वाजला, सिस्टर दरवाजा उघडायला गेली आवाजाची कुजबुज मला ऐकू आली पेशंट झोपला आहे त्याला भेटता येणार नाही असे ती सांगत होती, एक मित्र तिला सांगत होता कि त्याचे वडील भेटायला आले आहे फक्त एक मिनिट त्यांना पाहू द्या. हे ऐकताच अचानक माझ्या डोळ्यात पाणी आले. ऑक्सिजन मास्क काढून मी मोठ्याने आवाज दिला ओ.... येउद्या त्यांना.....



वडील आतमध्ये आले माझ्याकडे पहिले –खिन्नतेने ,विषन्नतेने. मनातून संपूर्णपणे खचले होते. मीच बोलून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो कि इथेच फक्त तोंडाला खरचटले आहे बाकी नॉर्मल आहे. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. उद्या बाहेर घेणार आहेत. काही काळजी करू नका. मी फक्त मला बरे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. पण माझे शरीर मुख्यता चेहरा काहीतरी वेगळेच वर्णन करत होता. ते पाठमोरी फिरले आणि नकळत परत डोळ्यातून पाणी आले.

विचारचक्र चालू झाले झोप काय येत नव्हती मित्र बाहेर बसून होते. कशीबशी रात्र गेली तेही रडत कण्हत.

दुसरा दिवस उजाडला मी वाट पाहत होतो बाहेर कधी काढतायेत. परंतु कोणीही मला काही सांगत नव्हते. सिस्टर ला विचारले असता डॉक्टर आल्यावर तुमच्या नातेवाईकांना सांगतील मग घेऊ बाहेर. पुन्हा मित्र नातेवाईक यांची गर्दी चालू झाली. सर्वजन भेटायला येऊ लागले. १० वाजता मुख्य डॉक्टर आले सगळी तपासणी केली. आता काही धोका नाही असे त्यांनी सांगितले.


घरी सर्वांना कळले होते,घरच्यांच्या मनस्थितीची कल्पना मी करूच शकत नव्हतो. निखिलचे आईबाबा येऊन तेही धीर देऊन गेले आणि त्यातच माझी आईदेखील गावावरून येत आहे असे मला कळले. मी वाट पाहत होतो, तिला उत्तर काय द्यायचे हेही विचार करत होतो. जवळ जवळ एक वाजता आई,बहिण आणि आत्या आली. आत्या आणि बहिण पुढे आली,मला पाहून सुन्न झाल्या , आणि त्यामागून आई आली पाहून एकदमच मोठमोठ्याने रडायला लागली. मला सांगितलं ‘काही नाहीझाले आणि माझ्या पोराला इथ किती लागले आहे’ असे ती रडता रडता म्हणत होती. सिस्टरहि सांगत होत्या काही झाले नाही बरे आहे त्याला काळजी करू नका. मी ओक्स्जीन मास्क काढून आईला सांगत होतो होतो मला काहीही झाले नाही बरे आहे. आई बाहेर जाऊन पण रडत होती. सगळेजण तिला समजवत होते परंतु शेवटी आईचे प्रेम आहे ते... जिथे मला पाहून माझे मित्र-मैत्रिणी रडले तिथे आईचे रडणे लाजमी होते.


जोपर्यंत चेहऱ्याची सूज कमी होत नाही तोपर्यंत हॉस्पिटल मध्ये ठेवावे लागेल असे डॉक्टरने सांगितले. जनरल वार्डसाठी भाडेही खूप होते त्यामुळे राजीव गांधी योजनेमध्ये स्टार हॉस्पिटलला हलवण्याचा निर्णय घेतला.


सर्वजन डीक्चार्गच्या तयारीला लागले, बिल भरमसाठ झाला होता, प्रत्येकजण मित्र आपापले प्रयत्न आपापली ओळख वापरून बिल कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते. अगोदरच निखिलच्या मामाने दोघांचीही एडव्हांस पैसे दिले होते तरीही योग्य बिल कमी होत नव्हता. शेवटी एका मित्राने थेट आमदारांपर्यंत संपर्क साधून जवळजवळ ३३% बिल कमी झाले आणि यातच प्रत्येकाच्या ओळखींची धन्यता होती. या गोष्ठी मला काही माहित नव्हत्या.


एकाने गाडी आणली. दुसर्याने कपडे घालण्य्साठी विकत घेत होता तर अनेक आपापल्या परीने धावपळ करत होते. याचदरम्यान तिकडे निखिलचे ऑपरेशनदेखील झाले होते. तो तिथेच होता.

दुपारी ३ वाजता डीक्चार्ग मिळाला आणि स्टार हॉस्पिटल निगडीला भरती झालो. तिथे अशी आशा होती कि राजीवगांधी आयोग्य योजनेअंतर्गत एडमिट होऊ परंतु आजार त्या योजनेत बसत नसल्या कारणाने तसेच भरती झालो.


गावावरूनसुद्धा मित्र आले होते. अनेकांचे फोन येत होते त्यांना उत्तर मित्रच देत होते, कारण बोलता येत नव्हते. काहीतरी खाव अस वाटत होत पण खाऊ शकत नव्हतो. खाण्यापिण्याची चिंता न करता सर्वजन मित्र बरोबरच होते नातेवाईकहि होते,घरचेहि होते.

तिथेही उपचार चालू झाले, वरून माझी अवस्था खूपच भयानक होती. अनेक मित्र-मैत्रिणी, नातेवाईक भेटायला येत होते एकदा तर रेसेप्षण टेबल बर बोलण्यात आले कि ,हे काय कॉलेज आहे की कॉलेज कट्टा.

आलेला प्रत्येकजन पैशाचे विचारात होते सरांनी तर स्वतःचे atm मित्राकडे दिले होते लागतील तेव्हडे काढ म्हणून. प्रत्येकानेच आपापल्या परीने आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे ऋण फेडणे कठीण आहे.


चार दिवस तिथे हॉस्पिटल मध्ये होतो, घरचे , मित्र सगळेच तिथेच बॉडीगार्डसारखे माझ्या बरोबर होते. माझ्या चेहऱ्याची अवस्था खूप वाईट ,भयानक झाली होती त्यामुळे मजाकमध्ये मित्र मला बोलत होते ‘आता मुलगी भेटणे अशक्य आहे लवमेरेज शिवाय पर्याय नाही आणि लवमेरेजला आलेली मुलगी सुद्धा आता लग्न करणार नाही’ खूप अवघड आहे आता तुझे. काही जन बोलत होते आपण चांदीचा दात बसवू तर काही बोलत होते आपण सोन्याचाच बसवू वेळ आनंदी ठेवण्याचा एक लाजीरवाणा प्रयत्न होता फक्त तो.



सहज एक दिवस हॉस्पिटलमध्ये एक गाण चालू होते “सुख में सब साथी दुख में ना कोई”


हे गाण ऐकून खरच डोळ्यात पाणी आले कारण माझ्या बाबतीत सगळे उलटे झाले होते सगळे जन ज्यांच्याकडून अपेक्षाहि नव्हते असे लोक सुद्धा मदतीला धावून आले होते.


पाच दिवसानंतर सूज कमी झाली आणि डीक्चार्ग भेटला तिथेही मित्रांच्या ओळखीने पुन्हा बिल कमी करण्यात मदत झाली.

त्या चार-पाच दिवसात होते नव्हते जुने क्लासमेट, सर, कामातले , मित्र, ओळखीचे असे सगळे भेटायला आले होते. यातच माझी धन्यता होती.

खरी कहाणी होती ती गावातली...




डीक्चार्ग भेटल्यानंतर दुसर्या दिवशी मी माझ्या गावी म्हसवंडीला घरी गेलो. जसे मला येताना पाहिले काहींना घरी आलो असे कळले लगेच आजुबाजुतील लोकांची गर्दी घरी मला पाहण्यासाठी झाली. हि तर नुकतीच सुरुवात होती. दुसर्या दिवशी जवळजवळ सगळ्या गावात मला घरी आणले आहे हे समजले होते. मी सकाळी उठायच्या आताच गावातील अनेक जन घरी आले होते. तबियेत कशी आहे ? डोक्याला मार तर नाही ना ? जास्त लागले तर नाही ना ? सगळे कसे झाले ? काळजी घे ...! जास्त बोलू नको ...! हे त्यांचे उद्गार असायचे.


कधी मनी कल्पनाही केली नव्हती कि असे काही होईल. अनेक नातेवाईक आपापला वेळ काढून भेटायला येत होते. आणलेल्या खाऊचा खूप मोठा ढीग झाला होता मला ओठांना टाके व जखम असल्यामुळे खाता येत नव्हते सगळ काही तसच पडत होते.

त्या आठ दिवसात गावातील असे कुठलेच घर नसेल कि ज्यातील व्यक्ती मला भेटायला आली नाही....मी मलाच आतून कोसत होतो. मी काहीतरी चूक केली आहे आणि त्याची शिक्षा इतरांना भोगायला लागत आहे असे मला वाटत होते. कधीहि मी न पाहिलेल्या व्यक्ती देखील भेटायला येत होत्या येताना एक बिस्कीट पुडा हा बरोबर देखील आणत होत्या.


माझी आजी मुंबईला होती ,तिला धक्का बसेल म्हणून आठ दिवस तिला काही सांगितले नाही. मी स्वतः फोनवर बोललो आणि मग आजीला बोलावले. आजीही मला पाहून हादरली पण डोक्याला मार नाही हे पाहून आजीच्या मुखातून उद्गार बाहेर पडले ‘आई मळाबाईने वाचविले’ नकळत आजी रडायला लागली होती. एव्हढेच काय शेजारच्या बायकांना देखील मला पाहून अश्रू अनावर झाले नाही तेही आल्यानंतर एका प्रकारे माझ्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत होत्या.


 याहीपेक्षा सर्वात जास्त काळजाचा ठाव घेणारी गोष्ठ म्हणजे ८५ ते ९० वर्षाच्या म्हातार्या अनेक आजी काठी टेकतटेकत मला भेटायला आल्या होत्या त्यांच्याकडे पाहून मी खरच निशब्द झालो होतो. हे माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे आले होते कि नाही माहित नाही परंतु माझ्या वडिलांवर करत असलेल्या प्रेमामुळे आले होते हे नक्की.


निसर्गाच्या कुशीत, मोकळ्या हवेत मी झटपट बरा होत होतो. परंतु माझे विचारचक्र कायम चालू असायचे, मी नकळत राहून राहून स्वतःलाच दोष देत होतो. रात्रभर झोप लागत नव्हती. पहाटे मंदिरात घंटानाद व्हायचा तो माझ्या बरोबर कानावर यायचा काकडा सुरु व्हायचा थोड्याच वेळात काही पक्षांची कुजबुजहि सुरु व्हायची आणि मला झोप तेव्हा लागायची हे दररोजचे सत्र झाले होते. नेहमीच १० रुपयाचा आंब्याचा ज्यूस पिणारा मी आठ दहा दिवस थेट अप्पल ज्यूस पीत होतो. कारण खाता काही येत नव्हते.

त्यानंतर पुन्हा डॉक्टरांकडे गेलो तपासणी केली, टाके काढले, व्यवस्थित ड्रेसिंग केली आणि तेव्हा चेहऱ्याकडे पहिले आणि बरे वाटले टाक्यांचे व्रण जास्त दिसत नव्हते, थोडेफार तर दिसणारच होते, डोक्याचे भलेमोठे टेंगुळ पूर्णपणे ओसरले होते, संपूर्ण काळा झालेला गाल व्यवस्थित झाला होता, दाताकडे पहिले तर दातही थोडासाच कट झाला होता. वेदना थोड्या होत्याच.

पुन्हा गावी जाऊन आता थोडेफार क्रिकेट पण खेळायला लागलो आहे. जखम व्यवस्थित भरून आली आहे. आता जवळजवळ पहिल्यासारखा झालो आहे.


म्हणतात ना,दैव जाणिले कुणी.........असो

माझ्या अत्यंत दुःखाच्या व वाईट परिस्थितीत आई मळावीदेचा आशीर्वाद , परमेश्वराची कृपा, लहान थोरांनी दिलेले प्रेमरूपी आशीर्वाद , कृशल टाइम मध्ये केलेली मदत यामुळेच इतक्या लवकर माझी तबियेत सुधारली आहे, जवळजवळ मी ९० टक्के बरा झालो आहे. सगळ्यांनीच केलेल्या सहकार्याचे मी ऋण फेडू शकत नाही परंतु शब्दरूपी आभार मानून थोडेसे उतराई होण्याचा प्रयत्न करतो.

गेली चारदिवसापासून पुण्यात आलो आहे बरेच काम बाकी होते ते संपवून व्यवस्थित मार्गी लाऊन पुन्हा आठवडाभर गावी जात आहे ,गावाच्या मोकळ्या हवेत लवकर ठणठनित होण्यासाठी.

आता
अपघातातून खूप काही शिकलो, समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजूनच बदलला, प्रेमाची, आपुलकीची व्याख्या बदलली. आता यात्रेला आई मळावीदेचा कृपाशीर्वाद घेऊन पुन्हा नेटाने जोशाने थोड्याश्या बदलेल्या जीवनाची नव्याने सुरुवात करायची म्हणतोय एक सुखी माणूस म्हणूस.......!





अपघाताच्या तीन दिवसानंतर 













मंगळवार, ८ मार्च, २०१६

महिला बचत गट व पाणलोट उपचारांमुळे सावरलेल्या गावाची कहाणी...!

एक विकसनशील गाव म्हणून संगमनेर तालुक्‍यातील माझे गाव म्हसवंडीची आज ओळख आहे. एके काळी छान असलेले जंगल लुटलं आणि गावाला पाण्यासाठी वणवण करावी लागली. पण पाणलोट उपचारांमुळे हे चित्र बदललं आहे. गाव विकासासाठी कास धरून पुढे जात आहे.
म्हसवंडी 
तीनशे उंबरठा असणारं सह्याद्रीच्या कुशीतलं म्हसवंडी हे छोटंसं गाव. पर्जन्यछायेतल्या या गावात तीन-चारशे मिलिमीटर पाऊस पडायचा. एवढ्याशा पावसातही गावाला जंगलाचा चांगला वारसा मिळाला होता. साधारणतः पन्नास-साठ वर्षांपूर्वी कोळसा व्यापाऱ्यांची नजर या जंगलाकडे पडली. गावकऱ्यांना पैशाचं आमिष दाखवून जंगलाचा कोळसा बनू लागला, पण ही चांदी थोड्या दिवसांचीच ठरली. जंगल संपल्यावर हे व्यापारी आणि तो पैसा उडून गेला. महिला पाण्याकरता वणवण हिंडू लागल्या. "इंडो-जर्मन पाणलोट विकास कार्यक्रम' व "वॉटर' या स्वयंसेवी संस्थेचे जनक फादर हर्मन बाकर यांनी 1994 मध्ये म्हसवंडीला भेट दिली. गावच्या दुर्दशेवर "पाणलोट उपचार' हा एकमेव उपाय असल्याचं त्यांनी गावकऱ्यांच्या गळी उतरवलं. फादर बाकर यांच्या विनंतीला मान देऊन संगमनेर सहकारी साखर कारखान्याने (आत्ताचा सहकारमहर्षि भाऊसाहेब थोरात सहकारी साखर करखान्याने ) मदतीचा हात पुढे केला. "नाबार्ड' वॉटर यांनी गाव पाणलोट समितीला अंमलबजावणीत मार्गदर्शन करायचं मान्य केलं.

गावकऱ्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणं हे सर्वांत मोठं आव्हानात्मक काम होतं. फादर बाकर आणि साखर कारखान्याला गावकऱ्यांचं मन वळवायला बरीच मेहनत घ्यावी लागली. कामाच्या शोधात, जगण्यासाठी मुंबईला गेलेल्या गावकऱ्यांना गावच्या विकासाची थोडीफार दृष्टी आली होती. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. अनेक जाणकार महिलांनी कार्यक्रमाच्या जागृतीकरता अनेक प्रकारे प्रयत्न केले. त्यांना गावातील समाजकार्यासाठी झटणाऱ्या मंडळींची बहुमोलाची साथ मिळाली. अनेक व्यक्तींनी हे काम माझेच असे स्वीकारून म्हसवंडीच्या उद्धारात स्वतःला झोकून दिलं. चराईबंदीला सुरवातीला खूप विरोध झाला. कारण त्या काळी पशुपालन हा बऱ्याच जणांच्या चरितार्थाचा एकमेव व्यवसाय होता. पण हळूहळू त्यांच्या गळी ही गोष्ट उतरली. तीच गोष्ट कुऱ्हाडबंदीची. "वॉटर' संस्थेच्या संचालक डॉ. मार्सेला डिसोझा यांच्याशी या संदर्भात झालेल्या भेटीचा प्रसंग अजूनही गावकरी महिलांच्या लक्षात आहे. कुऱ्हाडबंदीची अट मागे घ्यावी याकरता डोळ्यांत पाणी आणून महिलांनी मनीषा मॅडमना (गावकऱ्यांनी मार्सेलाचं केलेलं नामांतर) विनवलं. पण गावाच्या भल्याकरता त्यांना कठोर निर्णय घेणं भाग होतं. त्यांनी कुऱ्हाडबंदी काही मागे घेतली नाही.
पुढचा वसा होता बचतीचा. सुरवातीला 1996 मध्ये 20 रुपये मासिक बचतीचा "श्रमसाफल्य' हा पहिला बचत गट सुरू झाला. लवकरच गटांची संख्या वाढत वाढत आज ती 38 वर गेली. 2000 मध्ये या सर्व गटांची मळादेवी महिला विकास समिती नावाची शिखर संस्था अस्तित्वात आली. एव्हाना गावच्या महिला फार दूरचा विचार करू लागल्या होत्या. त्यांना आयुर्विम्याचं महत्त्व पटलं होतं. आज गावच्या सर्व महिलांचा विमा उतरवण्यात आला आहे. सर्व महिला विमा पॉलिसीधारक असणारं म्हसवंडी हे संगमनेर तालुक्‍यातील नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातील पहिलंच गाव. आयुर्विमा महामंडळाने त्याच्या या कामाची दखल घेऊन त्यांना 25 हजार रुपयांचा पुरस्कर दिला तर इंडियन ओवरसीज बॅंकेने "महिला बिमा ग्राम' म्हणून आणखी 25 हजार रुपयांचा पुरस्कार दिला.
कुऱ्हाडबंदीमुळे जाळण्यासाठी लाकडे नसणार हा विचार करून महिला समितीच्या माध्यमातून सर्व गावामध्ये अल्प दरात गॅस कनेक्शन जोडनि करून दिली आणि महिला समितीचा एक स्वतंत्र गॅस विभाग तयार झाला.
हळूहळू पाण्याचे प्रमाण वाढू लागल्याने गावात सर्वच नगदी पिके घेऊ लागली त्यात कांदा हे प्रमुख पिक.
त्यासाठी लागणारी सर्वच व्यवस्था बी-बियाणे, खते ,बारदान हे सर्वच अल्प दरात चालू केले.
पुढे कांडप मशीन व्यवसाय, शेवई मशीन व्यवसाय असे लघु उद्योग विभाग वाढत गेले.
महिलांनी स्वताच्या पैशातून त्यांच्या कारभारासाठी एक प्रशस्थ इमारत उभी केली आणि तिला नाव दिले ‘महिला श्रमदानवास्तू’.
फादर बाकर यांच्या विकास सूत्रीतलं सर्वांत महत्त्वाचं सूत्र होतं. पाणलोट उपचाराचं उजाड वन क्षेत्रातील 171 हेक्‍टर जागेवर वृक्ष लागवड करण्यात आली तर जवळपास 100 हेक्‍टर जागेवर गवती कुरणं व काही प्रमाणात झाडं लावली गेली. 367 हेक्‍टर क्षेत्रावर शेती बांध, समपातळी चर घालून वाहून जाणाऱ्या माती-पाण्याला अटकाव करण्यात आला. गावातून जाणाऱ्या नाल्यावर नाला बांध, जाळीचे बांध आणि चेक डॅम घालण्यात आले. पळणारं पाणी तांबू लागलं, थांबलेलं पाणी जिरू लागलं. विहिरींची संख्या दुप्पट झाली, आटलेल्या विहिरांना नव्याने पाझर फुटले. वीस वर्षांत शेतीखालील क्षेत्र पाच पटींनी वाढलं. जेथे जेमतेम तीन महिने शेतीची कामं चालत; तेथे आज वर्षभर हात कामात गुंतलेले असतात.






मळादेवी महिला विकास समिती,म्हसवंडी  
गेली पंधरा वर्षं राबवला जाणारा आणखी एक नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम म्हणजे दिवाळी भेट. प्रत्येक घरी- मग ते कितीही गरीब कुटुंब असो- दिवाळी साजरी व्हावी, या हेतूने पैशाच्या स्वरूपात भेट न देता दिवाळीच्या फराळाला आवश्‍यक सगळी सामग्री पुरवली जाते. यासाठी दरवर्षी बदलते नियोजन असते ( यावर्षी साखर २० किलो, डाळ ५ किलो,तेल ५ लिटर, रवा १ किलो, खोबरे १ किलो, मैदा १ किलो, केसांचे तेल १०० मिली, साबण १, कपड्याचा साबण १, वेलची पुडी १, जायफळ पुडी १ व नेलकटर १) असे एकूण ३८ गटातील ७१० महिलांना दिवाळी भेटीच्या रुपात वाटप करण्यात येते.





पाणलोटाच्या माध्यमातून केलेल्या कामाचा वसा आजही म्हसवंडीतील पुढील तरुण पिढी चालवत आहे.
वृक्षांनी व हिरव्यागार वनराईने संपन्न असलेल्या गावात आजही तेथील तरुण स्वखर्चाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन यांसारखे उपक्रम राबवत आहे. हेच म्हसवंडीचे काम पाहण्यासाठी जगभरातून लोक येत आहेत आणि यातच म्हसवंडीच्या प्रत्येक नागरिकाचे समाधान आहे.
महिला बचत गट व पाणलोट उपचाराच्या कामाने गावात फक्त समृद्धीच आणली असं नाही, तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महिलांमध्ये एकजूट झाली आहे, एक नवा आत्मविश्‍वास जागा झाला आहे, त्यांच्यात नेतृत्व विकास पावत आहे. विकास आणि पर्यावरणरक्षण हातात हात घालून कसे पुढे जाऊ शकतात, याचा हा एक वस्तुपाठच म्हणता येईल.......!


नयनरम्य मळादेवी मंदिर, म्हसवंडी